
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सन मराठीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील मुख्य पात्र समीर आणि अर्पिता यांच्या हळुवार फुलणाऱ्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन अनोळखी लोक एकमेकांच्या आयुष्यात येणे आणि त्यांचा एकमेकांच्या सोबतीने होणारा प्रवास मालिकेत रंजकतेने दाखवला जातोय.सध्या अर्पिता आणि समीरची मैत्री घरातल्या इतरांना खटकत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलण्याचे टाळण्याचे ठरवतात. दरम्यान, अर्पिता आणि विराज, तसेच समीर आणि राजसी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. घरच्यांच्या सुखासाठी आणि कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समीर आणि अर्पिता मनाविरुद्ध लग्न करण्यास तयार झाले आहेत, असा ट्विस्ट मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत नवीन नाट्यमय वळण येणार असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ झाली आहे.
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यामध्ये लग्नाच्या तयारीची धामधूम दिसत आहे. रुखवताची तयारी, साड्यांचा बस्ता, पत्रिका अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण या लग्नामुळे अर्पिता खरंच आनंदी आहे का? नेहमीच घरच्यांचा विचार करणाऱ्या अर्पिताच्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे? नियती अर्पितासाठी नेमकं काय ठरवणार?
मालिकेत अर्पिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण याबद्दल म्हणाली की, “मालिकेत खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अर्पिताचं लग्न पार पडणार आहे. स्वतःच सुख कशात आहे हे माहिती असूनही अर्पिता फक्त कुटुंबाचा विचार करते, त्यांचा आनंद पाहते. अश्या बऱ्याच मुली असतात ज्या स्वतःच्या मनाविरुद्ध कुटुंबाच्या सुखासाठी लग्नासाठी तयार होतात. पण आता अर्पितासाठी नियतीने काय ठरवलंय हे येत्या ८ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या मालिकेच्या सेटवर प्रचंड आनंदच वातावरण, लगबग, लग्नाची तयारी सुरु आहे. त्यामुळे शूटिंग करताना आम्ही सगळे खूप धमाल करतोय. लग्नसोहळा मालिकेत दिसताना सुंदर वाटतो. पण त्या मागे खूप मेहनत असते. यासाठी मालिकेची टीम दिवसरात्र काम करत आहे.ही लग्नसराई संपूर्ण आठवडाभर सुरु असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना अर्पिता म्हणून मी आग्रहाचं आमंत्रण देतेय. प्रेक्षकांशिवाय हे लग्न पार पडू शकत नाही.”