(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘सनई चौघडे’मध्ये जय-शरूच्या नात्याला नवं वळण
पार्टीत जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगानंतर जय आणि शरू यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. मात्र, एका अनपेक्षित घटनेत जय शरूचा जीव वाचवतो. या घटनेनंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
दुसरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय यावेळी गौतम आणि असावरीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. अंधश्रद्धेला न जुमानता तो त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देताना दिसणार आहे. तसेच मालिकेत वटपौर्णिमेचा विशेष भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘कमळी’मध्ये सरोजच्या मृत्यूचं गूढ उलगडणार?
सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिचा मृत्यू होतो. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते आणि तिच्या मृत्यूमागील सत्य शोधण्याची शपथ घेते.
सत्याच्या शोधासाठी कमळी मुंबईचा प्रवास सुरू करते. या प्रवासात ती केवळ गुन्ह्याचा तपासच करणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळालाही सामोरी जाणार आहे. अनेक रहस्यांचे धागेदोरे उलगडत असताना तिच्यासमोर नवी आव्हाने उभी राहणार असून या आठवड्यात कथेला महत्त्वाचं वळण मिळणार आहे.
‘तारिणी’मध्ये प्रेम, गैरसमज आणि तपासाला नवं वळण
केदारने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केल्यामुळे तारिणी आणि त्याच्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र, याच काळात केदार आपल्या मनातील भावना व्यक्त करत तारिणीला प्रेमाची कबुली देतो आणि तिला प्रपोज करतो.
दरम्यान, गुलाबच्या प्रकरणाचा तपास करत असताना तारिणीला आणखी एक मोठा धक्का बसतो. तिचे वरिष्ठ साधू सर यांची बदली झाल्याचं समोर येतं आणि त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या बदलामुळे तपासाची दिशा बदलणार असून तारिणीसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत.






