
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘Paaru’ संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीआरपी नसल्यामुळे किंवा आर्थिक तोट्यामुळे मालिका अचानक बंद होणे ही गोष्ट नवीन नाही. मात्र एखाद्या मालिकेचे चित्रीकरणच अचानक थांबावे आणि शेवटचा भाग प्रसारितच होऊ नये, अशी वेळ क्वचितच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘पारू’च्या बाबतीत नेमके असेच काही घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामागे टीआरपीची गणिते नसून कलाकार आणि तंत्रज्ञांचे थकीत मानधन हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून मालिकेशी संबंधित कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नव्हते. याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. परिणामी, चित्रीकरण ठप्प झाले आणि मालिकेच्या कलाकारांना गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.
Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट
दोन वर्षांच्या प्रवासात ‘पारू’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कथानकातील भावनिक चढ-उतार, व्यक्तिरे खांची सखोल मांडणी आणि दमदार अभिनयामुळे मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र अपरिहार्य कारणांमुळे आणि उत्पादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही मालिका काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचे वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाणार आहे आणि त्याबाबतची अधिकृत वेळ प्रेक्षकांना कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वाहिनीकडून देण्यात आलेल्या निवेदनात, “मालिकेवरील प्रेमाबद्दल आम्ही प्रेक्षकांचे ऋणी आहोत. आम्ही नेहमीप्रमाणे दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम देण्यास वचनबद्ध आहोत,” असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ‘पारू’चा शेवटचा भाग त्याच वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेसोबत ‘महासंगम’ भागाच्या स्वरूपात प्रसारित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत झी मराठीचा टीआरपी आकडा वाढल्याचे दिसत आहे. प्राइम टाइममध्येही वाहिनीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या ‘लक्ष्मी निवास’, ‘तारिणी’, ‘तुला जपणार आहे’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच ‘पारू’बाबत घेतलेल्या या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचे झाले तर, या मालिकेमध्ये शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मुग्धा कर्णिक यांनी अहिल्यादेवीची प्रभावी भूमिका साकारली होती. श्वेता शिंदे या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसल्या, अभिनेत्रीच्या लक्षवेधी कामगिरीने चाहत्यांचे मन देखील जिंकले. या सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली. आता मात्र या मालिकेच्या अचानक थांबण्यामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, शेवटचा भाग कधी आणि कसा प्रसारित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.