
मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट, प्रेक्षकांसाठी पर्वणी
सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या अत्यंत थरारक वळण पाहायला मिळत आहे. रतनच्या लग्नात ओवीचा भीषण अपघात होणार असतो, मात्र सावली वेळेत पोहोचून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचवणार आहे. विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी असूनही सारंग आणि सावली यांची भेट होऊ शकत नाही. दरम्यान, सारंग ओवी आणि सुशीलाला घेऊन परतत असताना पोलीस त्याला अडवतात आणि रतनची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पैसे जप्त करून त्यांना गावाबाहेर काढतात. यातून पोलिसांचे रतनशी असलेले साटेलोटे समोर येणार आहे. येते. सुशीलाला न्याय मिळवून देण्यासाठी सारंग पुन्हा गावात येतो, पण यादरम्यान गुंड ओवीच्या मागे लागतात. यात सावली तिचं रक्षण करणार आहे. यामुळे दोघींमध्ये मैत्रीचे नात निर्माण होणार आहे. आता सारंग जेव्हा ओवीला न्यायला येईल, तेव्हा तो आणि सावली समोरासमोर येतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लक्ष्मी निवास मध्ये भावनाच्या बाळाच्या जिवावर बेतणारा प्रसंग घडणार आहे. आजी भावनाच्या बाळाचा स्वीकार केल्याचे नाटक करते, पण तिचे खरे रूप रेणुकाच्या लक्षात येणार आहे. तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी लाँग ड्राइव्हवर गेल्यावर जयंत तिला लग्नासाठी प्रपोज करतो. घरामध्ये नीलांबरी एक भयानक कट रचतेय ती भावनाच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या बदलते ज्यामुळे आजीला धक्का बसलाय. बाजारात विनोदला बघून जयंतची घाबरगुंडी उडते, तर भावना आणि सिद्धूमध्ये रोमँटिक क्षण पाहायला मिळतील. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा भावनाच्या बाळाला पुन्हा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. सोबतच जान्हवी जयंतचा प्रस्ताव स्वीकारणार का, याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असणार आहे.
शुभ श्रावणीमध्ये श्रावणी आणि शुभूच्या आयुष्यात सध्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विश्वंभर श्रावणीकडे एक लाख रुपयांची मागणी करतो, आणि अलकनंदा हा मार्ग रोखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. मदतीसाठी श्रावणी तिची बहीण मोक्षा कडे जाते, जिथे तिची भेट शिरीष घाणेकर यांच्याशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कथेला खर वळण तेव्हा मिळणार जेव्हा शुभूच्या घरी एका कार्यक्रमात शुभू आणि श्रावणी नशेत एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली देतात. या कबुलीमुळे त्यांच्या नात्याला आता कोणती नवी दिशा मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल.
वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सध्या कौटुंबिक तणाव शिगेला पोहोचला आहे. अधिरा मंदाकिनीसमोर गुडघे टेकून माफी मागते, जे पाहून संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. दुसरीकडे, समर रोपांनी भरलेला टेंपो वाचवून स्वानंदीची प्रतिमा जपतो. समरचा हा मदतीचा स्वभाव आणि त्याचा पेहराव पाहून स्वानंदी त्याच्या प्रेमात पडणार आहे. त्यांच्यातील ही वाढती जवळीक कथेला एका रोमँटिक वळणावर घेऊन जाणार आहे.
‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार
दीप ज्योती मालिकेत एक भीषण अपघात संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकतो. एका हिट अँड रन केसमध्ये अभिजित आणि सुजयचा मृत्यू होतो. घाबरलेला स्वराज पळून जातो, पण दीप तिथेच थांबून मदत करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस तपासात एका निरपराध वृद्ध ड्रायव्हरला अडकवले जाते. ज्योती या अन्यायाविरुद्ध उभी राहाते, पण स्वराजला वाचवण्यासाठी दीप हा गुन्हा स्वतःवर घेतो. पुरुषोत्तम दीपला पोलिसांच्या स्वाधीन करतो, ज्यामुळे समाजात त्याची प्रतिमा उंचावते पण सत्य गाडले जाते. अभिजितच्या निधनानंतर प्रीती खचून जाते, तर ज्योती घर सावरण्यासाठी शिक्षण सोडून भावाचा युनिफॉर्म घालून रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेते. जेलमध्ये दीपवर प्राणघातक हल्ला होतो, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
सनई चौघडेमध्ये आसावरीच्या लग्नाची धावपळ सुरू असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आसावरीच्या अंगठीसाठी सोन जमवताना घरच्यांचा दागिन्यांच्या दुकानात अपमान होतो. शर्वरी आसावरीच्या लग्नासाठी जयकडे आगाऊ पगाराची मागणी करते, पण जय तिचा अर्ज फाडून टाकतो. दरम्यान, गौतम नशेत घरी आल्याने जय आणि तेजस्विनीला धक्का बसतो. आसावरीला पाहायला पाहुणे येणार असतानाच गौतम तिला भेटण्यासाठी तगादा लावतो, ज्यामुळे ती प्रचंड घाबरते. तर इकडे शर्वरी शिताफीने जयच्या केबिनमध्ये शिरून मिटिंग कॅन्सल करते जेणेकरून ती एंगेजमेंटला जाऊ शकेल.
Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!
कमळी मालिकेत कमळीने पुन्हा एकदा घरात आपले स्थान मिळवले असून अन्नपूर्णाने रागिणी आणि कामिनीला शिक्षा केली आहे. कमळीला जेव्हा कळते की पत्रांमागे ऋषीचा हात आहे, तेव्हा तिचा संताप होणार आहे. त्यातच ऋषी तिला आपल्या प्रेमाची कबुली देतो. तर दुसरीकडे अन्नपूर्णा आज्जी आणि नयनतारा त्या दोघांचे लग्न ठरवतात. कमळी आपण अन्नपूर्णाची खरी नात नसल्याचे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण परिस्थितीनुसार ती लग्नाला होकार द्यावा लागणार आहे. हे ऐकून अनिकाला मोठा धक्का बसून ती आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. या संकटामुळे कमळी आणि ऋषीचे लग्न पार पडणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तारिणी मालिकेत खांडेकर कुटुंबात मोठी सून म्हणून तारिणीने आता घराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ती ईशाकडून कामे करून घेण्यापासून ते सर्वांना शिस्त लावण्यापर्यंत कडक पावले उचलत आहे. कौशिकी तिला पूर्ण पाठिंबा आहे. दरम्यान, युवराजला ब्लॅकमेल करून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न करतंय, युवराज कौशिकीचे पैसे चोरतो आणि तारिणी त्याला रंगेहाथ पकडते. यावरून पद्मिनी आणि तारिणीमध्ये वाद होतात. संतापलेला युवराज बेलसरेच्या घरी जाऊन थयथयाट करतो आणि तारिणीने माफी मागितल्याशिवाय घरी परतणार नाही, अशी अट घालतो. आता काय असेल तारिणीचं पुढचं पाऊल ?
देवमाणूसमधला अध्याय मध्ये अजित कुमार पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात सर्वांना ओढत आहे. पोलिसांचा मार बसल्यानंतर तो बेशुद्ध पडण्याचे नाटक करत हॉस्पिटलमधून पळून जातो. कोर्टात त्याच्याविरुद्ध पुरावे सादर झाल्यावर त्याला पोलीस कोठडी मिळते. यादरम्यान लालीला वकील युगंधर प्रताप भेटतो. युगंधर आपल्या स्टाईलने लालीला प्रभावित करतो आणि तिची केस लढण्याची तयारी दर्शवतो. अजित आणि युगंधरमध्ये आता वर्चस्वाचं युद्ध सुरू झालं आहे.
तुला जपणार आहेमध्ये अंबिका आणि मीरा खोट्या अथर्वच्या वागण्यामुळे प्रचंड गोंधळलेल्या आहेत. खोटा अथर्व मायासोबत चांगले वागत असल्याचे पाहून त्यांच्या मनात शंका निर्माण होते. यादरम्यान मीराला गरोदर करण्यासाठी एक प्लॅन आखला जातो, पण तो अयशस्वी ठरतो. देवी आजी अंबिका आणि मीराला एक कोडे घालते, ज्यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे. आता खोटा अथर्व आणि खरा अथर्व समोरासमोर येणार का ? आणि या घराचे रहस्य उघड होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या आवडत्या मालिकांमधील नाट्यमय वळणे चुकवू नका, कारण इथे प्रत्येक वळणावर आहे एक नवी गोष्ट!