
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वारीत अविरत चालणारी मंडळी आणि विठ्ठल माऊलीचे सेवाकरी आणि त्यांचा सोबतीने कधीतरी आपण सुद्धा वारी करावी अस मनात असलेली एक इच्छा आणि यंदाच्या वारीत अभिनेत्री अक्षया नाईकची हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. अक्षया ने तिच्या पहिल्या वहिल्या वारीचा अनुभव शेयर केला.
वारीबद्दल बोलताना ती भरभरुन बोलली. अक्षयाने तिच्या पहिल्या वारीचा अनुभव शेअर करताना सांगितलं, “ वारी बद्दल कायम मनात एक उत्सुकता होती कधीतरी आपण सुद्धा असंच बाकी वारकरी मंडळीसोबत वारी अनुभवू शकू का? हा प्रश्न कायम मनात होता आणि यंदा अचानक का होईना पण पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली वारी अनुभवली”, असं म्हणत तिने विठ्ठलाकडून आलेल्या बोलवण्याचा आवर्जुन उल्लेख केला.
वारकऱ्यांच्या उत्साहाबाबत तिने विशेष सांगताना म्हणाली की,” वारीत चालणारी मंडळी बघून त्यांचा मध्ये एवढी ऊर्जा कशी येत असावी हे वारीत जाऊन अनुभवता आल. हा समृद्ध संपन्न अनुभव शब्दांत मांडूच शकत नाही कारण अस म्हणतात वारी ही अनुभवावी लागते आणि हा प्रत्यय वारी करून आला. टाळ मृदुगांचा गजर, हरिनामाचा जप आणि वारी मधला उत्साह हा शब्दाच्या पलीकडचा आहे. वारीत जाऊन मला विठ्ठल रुखमिणी रूपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी देखील मिळाली आणि माझी वारी सुफळ संपूर्ण झाली” अशा शब्दांत तिने आपला वारीचा अनुभव सांगितला आहे.
आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राच्या लोकजीवनाची, संतपरंपरेची आणि भारतीय संस्कृतीतील भक्ती आंदोलनाची जिवंत ओळख आहे. सुमारे हजार वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही त्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने पुढे चालू आहे. आजही ती तितक्या आदराने आणि प्रेमाने जपली जात आहे. ही संस्कृती जगण्यासाठी हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा तरी वारी अनुभवावी असं बरेच जण सांगतात. पण हे असं का सांगतात ते वारीत गेल्याशिवाय कळायचं नाही.