Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment News: टीव्ही आणि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता राम कपूर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. आपल्या मोकळ्या स्वभावामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजामुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र, शोमधील एका प्रसंगानंतर राम कपूरला सोशलमीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
लॉक अपमधील स्पर्धेक श्रेया कालराने रामच्या एका वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, रामने वारंवार तिचे चुंबन घेतल्याने तिला अस्वस्थ वाटले. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या विषयाची चर्चा सुरू झाली. काही लोकांनी राम कपूरला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तर काहींनी या प्रकरणावर वेगवेगळी मतं मांडली. Ram Kapoor
काही काळ शांत राहिल्यानंतर राम कपूरने या संपूर्ण प्रकरणावर आपले मत मांडले. नयनदीप रक्षित यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीमध्ये त्याने श्रेया कालराच्या आरोपांबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले. राम कपूरने सांगितले की, एखाद्या व्यक्तीने त्याच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला तरी तो त्याबद्दल जास्त विचार करत नाही. आपल्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहताना त्याला स्वतःबद्दल समाधान असल्याचेही त्याने म्हटले. जवळपास २७ वर्षांच्या प्रवासात आपल्या वागण्यावर कोणत्याही अभिनेत्रीने गंभीर प्रश्न उपस्थित केले नसल्याचे रामने सांगितले.
शोमध्ये श्रेया कालराने त्याच्याशी याबाबत चर्चा केली होती, असेही रामने सांगितले. तिच्या मनात आपल्याविषयी काही चुकीचा हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केल्याचे त्याने नमूद केले. त्यामुळे या विषयाला जास्त मोठे रूप देण्याची आपली इच्छा नसल्याचे रामने स्पष्ट केले.
राम कपूरच्या मते, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि दुसऱ्यांच्या मतानुसार स्वतःमध्ये सतत बदल करत राहणे योग्य नाही. आयुष्यभर जसा राहिलो, तसाच पुढेही राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल बोलताना रामने त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे सांगितले. त्याच्या मते, अशा गोष्टींमध्ये अडकून राहिल्याने वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. मनोरंजन क्षेत्रात काम करताना प्रसिद्धीसोबत टीकाही येते, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
रामने आपल्या करिअरकडेही सकारात्मक नजरेने पाहिले. २७ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले, अनेक कलाकार आणि लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एका वादामुळे संपूर्ण लक्ष नकारात्मक गोष्टींकडे देण्याचे कारण नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
“लोक माझ्याबद्दल काय बोलतात, यापेक्षा मी माझ्या आयुष्यात काय करत आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,” असा त्याचा स्पष्ट सूर होता. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष देणे आणि पुढे जाणे यालाच आपण प्राधान्य देत असल्याचे त्याने सांगितले.
राम कपूरने या प्रकरणावर घेतलेल्या भूमिकेमुळे आता पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू झाली आहे. काही वाद सोशल मीडियावर मोठे होत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग रामने निवडला आहे. त्यामुळे पुढील काळात हा विषय किती पुढे जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






