फोटो सौजन्य - Social Media
मराठी लहान पडद्यावरची सुप्रसिद्ध अशी जोडी अक्षया-विशाल आता खऱ्या आयुष्यातही एकत्र झाले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी उत्तराखंडच्या त्रियुगीनरायण मंदिरात लग्नकार्य हुरकलं. पण तुम्हाला माहिती आहे का? उत्तराखंड येथे स्थित असलेले त्रियुगीनरायण मंदिर म्हणजे प्रेमाचे मंदिर आहे. या मंदिराला विशेष स्थान आहे. पण का? चला तर मग जाणून घेऊयात.
त्रियुगीनारायण मंदिराला “प्रेमाचे मंदिर” का म्हटले जाते, यामागे एक पौराणिक कथा आहे. मान्यता अशी की याच पवित्र स्थळी शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. या विवाहाचा साक्षीदार म्हणून येथे प्रज्वलित केलेला अग्नी आजही अखंड तेवत असल्याचे सांगितले जाते. या अग्नीला “अखंड धुनी” असे म्हटले जाते आणि तो वैवाहिक नात्यातील सातत्य, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो.
पुराणांनुसार, पार्वतीने शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी विवाहास संमती दिली. या दिव्य विवाह सोहळ्यास अनेक देव-देवतांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. त्या घटनेची स्मृती म्हणून हे मंदिर आजही विशेष मानले जाते. म्हणूनच येथे होणारे विवाह केवळ एक सोहळा नसून पवित्र आणि दैवी आशीर्वादाने परिपूर्ण मानले जातात.
मंदिराच्या परिसरात असलेली शांतता, हिमालयीन निसर्गरम्यता आणि आध्यात्मिक वातावरण नवदांपत्यांसाठी अत्यंत भावनिक क्षण निर्माण करते. येथे विवाह केल्यास वैवाहिक जीवन सुखी, स्थिर आणि प्रेमपूर्ण राहते, अशी श्रद्धा अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही काही जोडपी येथे विवाहासाठी येतात.
अक्षया-विशाल यांनीही आपल्या आयुष्यातील या खास क्षणासाठी हेच ठिकाण निवडले, यामागे प्रेमाला दैवी अधिष्ठान देण्याची भावना असल्याचे बोलले जात आहे. त्रियुगीनारायण मंदिरातील अखंड अग्नी आणि शंकर-पार्वतीच्या विवाहाची परंपरा या दोघांच्या नव्या आयुष्याच्या प्रारंभाला एक वेगळेच आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व देते.
म्हणूनच त्रियुगीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर प्रेम, समर्पण आणि सात जन्मांच्या बंधाचे प्रतीक मानले जाणारे खरे “प्रेमाचे मंदिर” आहे.






