
अनुप जलोटा आणि अनुजा सहाय यांची खास मुलाखत
गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून, अनुप जलोटा हे भारतातील भक्तिसंगीतातील अत्यंत लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत; आपल्या भावपूर्ण गायनाने लाखो लोकांची मने जिंकत त्यांनी ‘भजन सम्राट’ ही पदवी मिळवली आहे. आता ५ जुलै रोजी अनुप जलोटा एक अनोखा ऐतिहासिक असा कारनामा करणार आहेत. डरबन येथे २,७०,००० वेळा हनुमान चालिसा पठण होणार असून यामध्ये गायिका अनुजा सहायदेखील त्यांना साथ देणार आहे. या निमित्ताने अनुप जलोटा आणि अनुजा सहाय यांनी ‘नवराष्ट्र’सह खास गप्पा मारल्या आहेत.
अनुप जलोटा यांनी जेव्हा आम्ही विचारलं की, २,७०,००० हनुमान चालिसा पठणाच्या या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याची कल्पना कशी सुचली? आणि या कार्यक्रमाचा उद्देश नक्की काय आहे? तेव्हा त्यांनी अगदी मनापासून सांगितलं की, ‘स्वामी अभेदानंदांच्या सुंदर संकल्पातून या उपक्रमाला प्रेरणा मिळाली आहे, जो भक्तीच्या माध्यमातून समाजाला एकजूट करण्याचा संदेश देतो. चिन्मय मिशनच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम, हनुमान चालिसेच्या माध्यमातून जगभरातील लोकांना एकत्र आणण्याचा आणि भारतीय संस्कृती, भक्ती व आध्यात्मिक मूल्ये जागतिक स्तरावर पसरवण्याचा एक प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश केवळ सामूहिक हनुमान चालिसा पठण करणे हा नाही, तर भक्ती, ऐक्य आणि सेवेची भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. चिन्मय मिशनने नेहमीच अध्यात्मासोबतच समाजसेवेलाही समान महत्त्व दिले आहे आणि हा कार्यक्रम तीच दूरदृष्टी पुढे नेण्याचे एक साधन आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी डर्बनची निवड करण्यामागे काय कारण होते? असं विचारल्यावर ते म्हणाले की, ‘डर्बनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची मोठी लोकसंख्या आहे, ज्यांनी वर्षानुवर्षे आपली संस्कृती आणि परंपरा जपल्या आहेत. चिन्मय मिशन दक्षिण आफ्रिका देखील तेथे बऱ्याच काळापासून समाज आणि संस्कृतीच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करत आहे. त्यामुळे, या कार्यक्रमासाठी डर्बन हे एक नैसर्गिक आणि अर्थपूर्ण ठिकाण आहे.’
यानंतर प्रश्न असा आहे की, हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक कार्यक्रम आहे की त्यामागे काही सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश आहे? यावर त्यांनी स्पष्ट केले की, ‘हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही. स्वामी अभेदानंदजींपासून प्रेरित होऊन, समाजात एकता, सलोखा, सेवा आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये दृढ करण्याचा हा एक प्रयत्न देखील आहे. जेव्हा हजारो लोक एकत्र प्रार्थना करतात, तेव्हा ते समाजाशी जोडले जाण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे एक माध्यम बनते.’
अनुप जलोटा यांचे जगभरात चाहते आहेत आणि यावर आम्ही विचारले की, ‘तुम्ही जगभरात भजने गायली आहेत. परदेशात भारतीय संस्कृती आणि भक्तीमध्ये तुम्ही कोणते बदल पाहिले आहेत?’ त्यावर अगदी मनमोकळेपणाने त्यांनी सांगितले की, ‘भारतात आणि परदेशात अनेक वर्षे भजने गाताना माझ्या लक्षात आले आहे की, लोकांचे भारतीय संस्कृती आणि भक्तीशी असलेले नाते सातत्याने वाढत आहे. विशेषतः नवीन पिढी आपल्या मुळांना जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी उत्सुक आहे. असे कार्यक्रम त्यांना त्यांच्या परंपरांच्या अधिक जवळ आणतात. अनुजा सहाय यांच्यासारख्या प्रतिभावान गायिका आणि अभिनेत्री भक्ती संगीतात पूर्णपणे सामील झाल्या आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. जेव्हा तरुण कलाकार या भावनेने पुढे येतात, तेव्हा आपला सांस्कृतिक वारसा त्याच आदराने भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, हा विश्वास अधिक दृढ होतो. स्वामी अभेदानंदजींनी घेतलेली ही प्रतिज्ञा आणि चिन्मय मिशनच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला हा उपक्रम, केवळ एक कार्यक्रम नसून, जगभरात भक्ती, सेवा आणि भारतीय संस्कृतीला जोडणारी एक सुंदर मोहीम आहे. मला खात्री आहे की याचा संदेश दूरवर पोहोचेल आणि लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल.
अनुप जलोटा यांच्यासह अनुजा सहायदेखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे आणि यावेळी तिच्याकडूनही आम्ही काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्यामधील सर्वात मोठे आव्हान कोणते होते? असं विचारल्यावर अनुजा म्हणाली की, ‘प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाची स्वतःची आव्हाने असतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकल्पांवर काम करताना मी हे शिकले आहे की, कोणत्याही कार्यक्रमाची सर्वात मोठी ताकद त्याची टीम असते. ‘मन टू हनुमान’ सारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातही, स्वामी अभेदानंदजींनी कल्पना केल्याप्रमाणेच, कार्यक्रमाचा आत्मा त्याच आदराने आणि सन्मानाने हजारो भक्तांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. जेव्हा संपूर्ण संघ एकाच उद्दिष्टासाठी,भक्ती, सेवा आणि समाजाला जोडणे हे काम करतो, तेव्हा प्रत्येक आव्हान सोपे वाटते.’
Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला
अनुप जलोटा यांच्यासोबत काम करताना तुला कसे वाटले? असं विचारल्यावर तिने सांगितले की, ‘माझ्यासाठी, ही केवळ एका कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी नव्हती, तर माझ्या गुरूंसोबत या आध्यात्मिक प्रवासात सामील होण्याचा एक बहुमान होता. अनुपजींकडून मी केवळ संगीतातील बारकावेच नाही, तर हेही शिकलो की एका कलाकाराची खरी ओळख त्याच्या नम्रतेत, शिस्तीत आणि प्रेक्षकांबद्दलच्या आदरात असते. आजही, त्यांना पाहून मला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन टू हनुमान’ सारख्या भव्य कार्यक्रमाचा भाग होणे हा एक सन्मान आणि आशीर्वाद आहे. मला खात्री आहे की स्वामी अभेदानंदजींची प्रेरणा, चिन्मय मिशनची ७५ वर्षे आणि अनुपजींच्या उपस्थितीमुळे, हा कार्यक्रम हजारो भक्तांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरेल.’
आजच्या तरुण पिढीने हनुमानजींच्या जीवनातून काय शिकावे? असं तुला वाटतं यावर अनुजा म्हणाली की, ‘माझा विश्वास आहे की, आजच्या तरुणांसाठी हनुमानजींचे जीवन पूर्वीपेक्षाही अधिक समर्पक आहे. ते आपल्याला समर्पण, धैर्य, शिस्त, नम्रता आणि निःस्वार्थ सेवा शिकवतात. जर तरुणांनी ही मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारली, तर ते केवळ आपली स्वप्नेच पूर्ण करणार नाहीत, तर समाजासाठी प्रेरणास्थानही बनतील. चिन्मय मिशन गेल्या ७५ वर्षांपासून सेवा आणि मूल्यांच्या माध्यमातून हाच संदेश जगात पसरवत आहे आणि या प्रवासाचा एक छोटासा भाग असल्याचा मला आनंद आहे.’