अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मजूर रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना हैलोंग-चकलागम रस्त्यावरील मेटेलियांगजवळील एका टेकडीवरून ट्रक खाली कोसळला. अपघाताच्या वेळी २२ कामगार त्यात होते. ट्रक दरीत पडताना रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिले आणि जवळच्या पोलिस ठाण्याला कळवले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढले आहेत. नऊ जणांचा शोध अजूनही सुरू आहे. आतापर्यंत १९ कामगारांची ओळख पटली आहे: बुधेश्वर दीप, राहुल कुमार, समीर दीप, जॉन कुमार, पंकज माणकी, अजय माणकी, विजय कुमार, अभय भूमिज, रोहित माणकी, बिरेंद्र कुमार, अगर तातीची, धीरेन चेतिया, रजनी नाग, दीप गौला, रामचबक सोनार, सोनातन नाग, संजय कुमार, करण कुमार आणि जोनास मुंडा. सर्व १९ कामगार आसाममधील तिनसुकिया येथील गेलापुखुरी टी इस्टेटचे रहिवासी होते.
ज्या ठिकाणी ट्रक खड्ड्यात पडला तो भाग शहरापासून खूप दूर असलेला दुर्गम भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना अपघाताची माहिती खूप उशिरापर्यंत देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी १८ तास लागले, त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. पोलिसांनी आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढले आहेत. इतर नऊ जण बेपत्ता आहेत. त्यापैकी कोणीही वाचण्याची शक्यता नाही. पोलिस त्यांचा सक्रियपणे शोध घेत आहेत.






