हजरतबल दर्ग्यातील गोंधळात अशोक स्तंभ चिन्हावर हल्ला; मुस्लिमांचा अशोक चिन्हावर आक्षेप आहे का?
श्रीनगरच्या प्रसिद्ध हजरतबल दर्ग्यात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. महिलांना पुढे करून आक्रमक जमावाने दर्ग्यावरील शिलालेख तोडण्यास सुरुवात केली. देशाचे प्रतीक असलेल्या अशोक चिन्हावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा ठरला. महिलांनी रागाच्या भरात दगड घेऊन निषेध नोंदवला. यापूर्वीही काही कट्टरपंथीयांनी उद्घाटन फलकाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली होती. महिलांपैकी काहींचे चेहरे झाकलेले होते किंवा त्यांनी बुरखा परिधान केला होता. काही वेळ पोलिसांनी उद्घाटन फलकाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तेही मागे हटले. या घटनेमुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, काश्मीरमधील काही गटांना देशाच्या राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावर आक्षेप का आहे, असा प्रश्न पडतो,
Breaking: श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यातील नूतनीकरणावरून राडा; आक्रमक जमावाने अशोक स्तंभ तोडला
खरं तर, हजरतबल दर्ग्याचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले असून त्यानंतर हा नवा शिलालेख बसवण्यात आला. नेहमीप्रमाणे त्यावर काही नावे, लोगो आणि अधिकृत चिन्हे कोरलेली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी अचानक जमाव संतप्त झाला. दगड हातात घेऊन आलेल्या लोकांनी शिलालेखाच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या चिन्हावर जोरदार दगडफेक केली आणि त्याचे नुकसान केले.
मुस्लिमांचा अशोक चिन्हावर आक्षेप आहे का?
या प्रकरणात काही कट्टरपंथीयांनी मुद्दाम वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. शिलालेखावरील अशोक चिन्हाबाबत त्यांनी असा युक्तिवाद केला की, मशिदीत मूर्ती किंवा कोणतेही प्रतिकात्मक शिल्प ठेवता येत नाही. त्यामुळे संपूर्ण फलक काढून टाकावा, अशी मागणी जमावाकडून करण्यात आली. दरम्यान, संध्याकाळपर्यंत जम्मू-काश्मीर पोलिसांनी शिलालेखावरील अशोक चिन्ह तोडल्याच्या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
या फलकाचे उद्घाटन जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दर्शन अंद्राबी यांनी केले होते. अशोक चिन्हाचा अपमान झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या कृत्याची तुलना दहशतवादी कृतीशी केली. ‘दर्ग्याच्या नूतनीकरणानंतर बसवलेल्या संगमरवरी फलकावरून हा वाद निर्माण झाला आहे. डॉ. अंद्राबी म्हणाल्या की, “हजरतबल दर्ग्यावरील राष्ट्रीय चिन्ह तोडणे हे दर्ग्याचा तसेच मुस्लिम समुदायाच्या भावनांचा अपमान आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे ते दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत. जेव्हा मी हे चिन्ह तुटताना पाहिले तेव्हा असे वाटले की जणू आकाशातले ढगच कोसळले आहेत. पण फलक तोडणाऱ्या संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी.” अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना केली आहे.
अंद्राबी म्हणाल्या की, ‘याला जबाबदार असलेल्या सर्वांवर एफआयआर दाखल केला जाईल. यामध्ये ज्या आमदाराच्या ट्विटने आगीत इंधन भरले आहे त्यांचाही समावेश आहे.’ एका राजकीय पक्षाच्या गुंडांनी हे कृत्य केले आहे. यापूर्वीही या गुंडांनी काश्मीरमध्ये हाहाकार माजवला होता. संध्याकाळी उशिरा फारुख अब्दुल्ला हजरतबल दर्ग्यात पोहोचले आणि संतप्त लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. प्रकरण शांत होईल असे मानले जात आहे. परंतु हल्लेखोरांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. व्हिडिओमध्ये ते सर्व स्पष्टपणे दिसत आहेत.