चेन्नई : भारतीय जनता पक्षाने तामिळनाडू राज्यात ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत (TMC) हात मिळवला आहे. राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये सोबत राहणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आघाडीनंतर प्रदेश भाजपने वासन यांच्या राजकीय कार्याचे भरभरून कौतुक केले.
भाजपने तामिळनाडू राज्यात द्रमुक तसेच अण्णा द्रमुकशिवाय अन्य पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यात आज यश आले असून, जी. के. वासन यांच्या नेतृत्वातील तामिळ मनिला काँग्रेससोबत (टीएमसी) हातमिळवणी केली. यानंतर टीएमसीने राज्यातील अन्य पक्ष सुद्धा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली. आपले वडील तसेच नेता मुपनार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्तरावर राहिलेला आहे.
तामिळनाडू राज्यासह येथील जनतेचे कल्याण आणि समृद्ध भारताच्या निमिर्तीसाठी भाजपासोबत आघाडी करण्यात आली. सध्या देशाचा आर्थिक विकास अतिशय महत्वाचा आहे. लवकरच भारत तिसरी आर्थिक शक्ती बनण्याच्या तयारीत असल्याने अशा स्थितीत भाजपला साथ गरजेची असल्याचे जी. के. वासन यांनी सांगितले. येत्या 27 फेब्रुवारीला तिरुपूरमधील पल्लडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा आयोजित केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दिवंगत नेता जी. के. मुपनार यांनी अण्णा द्रमुकसोबत आघाडी केल्याने काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता. त्यांनी 1996 मध्ये टीएमसी पक्षाची स्थापना केली. नंतरच्या काळात 2002 मध्ये हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. परंतु, वासन यांनी 2014 मध्ये बाहेर पडत पुन्हा टीएमसी पक्ष उभा केला.






