(Photo - Social Media)
गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या विस्ताराची संभाव्य तारीखही समोर आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या विस्तारात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार, कोणत्या मंत्र्यांकडील खाती बदलली जाणार आणि कोणत्या नेत्यांची जबाबदारी वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०२४ मध्ये मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सातत्याने चर्चा होत होती. आता संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना आणखी वेग आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासोबतच धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. शिक्षण खात्याच्या जबाबदारीत बदल झाल्यानंतर हे मंत्रालय आता कोणाकडे जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्मेंद्र प्रधान यांची पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे २१ ऑगस्टला होणाऱ्या संभाव्य विस्तारात त्यांच्या नावाचा समावेश होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना महाराष्ट्राच्या राजकारणाची किनार मिळाली आहे. फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
या पार्श्वभूमीवर फडणवीस केंद्रात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, फडणवीसांनी स्वतः या चर्चांचे खंडन करत आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी फडणवीसांच्या भूमिकेबाबत कोणताही बदल होतो का, याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष असणार आहे.
संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडील वाणिज्य मंत्रालय कायम राहणार की त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी सोपवली जाणार, याबाबतही उत्सुकता आहे. त्याचबरोबर गजेंद्रसिंह शेखावत यांच्या पर्यटन मंत्रालयाबाबतही चर्चा सुरू आहे. पर्यटन मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःकडे ठेवू शकतात, अशी माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व शक्यता आणि चर्चांकडे सूत्रांची माहिती म्हणूनच पाहावे लागणार आहे. २१ ऑगस्टला प्रत्यक्षात कोणते बदल होतात, कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते आणि कोणत्या मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल होतो, हे त्यानंतरच स्पष्ट होईल.