भटक्या कुत्र्यांवरील बंदी हटणार का? (फोटो- istockphoto)
१. सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये सोडण्याचा आदेश
२. या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे.
३. कोर्टाने हा देश दिल्ली सरकारला दिला आहे.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे. या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर दिल्लीत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत आता सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाष्य केले आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?
सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.
सुप्रीम कोर्टाने आदेश देत असताना, ज्या नागरिकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला होता. भटक्या कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. त्वरित या सर्व भटक्या कुत्र्यांना पडकून शेल्टर होममध्ये पाठवावे, असे या आदेशात म्हटले आहे. जवळपास ५००० कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची आवश्यकता असल्याचे कोर्टाने म्हटले होते.
नेमके काय घडले?
सुप्रीम कोर्टात एका वरिष्ठ वकिलांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने कॉन्फरन्स फॉर ह्युमन राईट्स (इंडिया) ची याचिका दाखल केली आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी असलेल्या कायद्याचे पालन केले जात नाही, असे सांगण्यात आले आहे. यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘मी याबाबत विचार करेन’ असे म्हटले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयावर कायम राहणार की त्यामध्ये काही बदल करणार हे येणाऱ्या कालावधीत पाहणे आवश्यक असणार आहे.