नवी दिल्ली : लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीसाठीचे (Election) एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी ट्वीट्स केले आहेत.
शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
सुरक्षा संस्थांचेही मानले आभार
संपूर्ण निवडणूक सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या सुरक्षा व्यवस्था संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्ष होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे लोकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरक्षा व्यवस्थेतील सर्वांनी दिलेली सेवा ही कौतुकास पात्र आहे, असंही मोदी म्हणाले.
Heartfelt gratitude to our outstanding security forces for their unwavering vigilance during the entire elections. Their efforts have ensured a safe and secure environment, enabling people to take part in the polling process with ease. Their service to the nation is deeply… — Narendra Modi (@narendramodi) June 1, 2024
एनडीए कार्यकर्त्यांसाठी ट्वीट
एनडीएच्या कार्यकर्त्यांनी आपला विकासाचा अजेंडा जनतेला समजावून सांगितला. तीव्र उष्णता असताना एनडीच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्या सर्वांचे मी कौतुक करतो. तीव्र उष्णता असताना मी एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कौतुक करू इच्छितो. आपले कार्यकर्ते हेच आपलं बळ आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
देशात पुन्हा मोदी सरकार?
1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यावेळीही भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला एकूण 353-383 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळू शकात. हा अंदाज खरा ठरल्यास मोदींचा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा होईल.