
Ashutosh Ranka, Delhi Police, CJP Protest, Jantar Mantar
Delhi CJP Protest Live: कॉकरोच जनता पार्टीच्या २० जुलैच्या मोर्चानंतर आज (22 जुलै) रात्री साडेआठच्या दरम्यान जंतरमंतर पुन्हा मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतरही वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरातील आज सकाळचे ताजे फोटो शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. “काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरबाहेर प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून लोकांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. तरीही, आज सकाळी जंतरमंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.”
धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील: अभिजीत दिपके
सीजेपी प्रमुख अभिजित दीपक म्हणाले की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही.
“We won’t call off our protest until our demands are met and Dharmendra Pradhan resigns.” : Abhijeet Dipke. pic.twitter.com/LqOTcuR881 — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 22, 2026
कालच्या राड्यानंतर आता जंतर मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिल्ली मेट्रोची अनेक प्रमुख स्थानके आज सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, कार्यालय, महाविद्यालय किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी घरातून निघण्यापूर्वी आपला मार्ग तपासावा.
दिल्ली मेट्रोनुसार, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर प्रवाशांसाठी केवळ इंटरचेंज सुविधा उपलब्ध असेल. या स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार नाही.
यापूर्वी, काल रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या ३,००० ते ४,००० पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत ती वाढतच राहिली. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेथे मोठ्या संख्येने “समाजकंटक” जमले होते. यापैकी काही आंदोलकांनी आधी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
या संघर्षात दोन एसीपी, दोन इन्स्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर मंतर, टॉल्स्टॉय मार्ग आणि पार्लमेंट मार्गावरील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सूत्रांनुसार, परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने त्यांचेही ऐकले नाही.