
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पहिला आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र, आता या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हीच आकडेवारी संशयास्पद असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यावरून आज विरोधी पक्षातील सर्व नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांची भेट घेणार आहेत.
देशामध्ये 19 एप्रिल रोजी 102 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. त्यावेळी संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 60 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. तर 26 एप्रिल रोजी देशातील दुसरा टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी 88 मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. तर याच दिवशी 61 टक्के मतदान झाले असल्याचे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दहा दिवस झाल्यानंतर तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला तीन दिवस झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.
या अंतिम आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये 66.14 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदानाच्या दिवशी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यात तब्बल 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी संशयास्पद वाटत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षातील सर्व नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन या विषयी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.