
Priyank Kharge Critiziced RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सैतान आहे आणि भाजप त्याची सावली आहे. अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे (Congress) मंत्री प्रियांक खर्गे यांनी केली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना प्रियांक खर्गे यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “आपण सावलीशी लढत आहोत. जर आपण या सैतानाशी लढलो तर देश सुधारेल, आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आर्थिक स्त्रोतांवरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आरएसएसकडे २,५०० हून अधिक संघटनांचे मोठे नेटवर्क असून त्यांना अमेरिका आणि इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे,” असा दावा खर्गे यांनी केला आहे. हे लोक मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेले असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
खर्गे म्हणाले की, “आरएसएसला अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत विविध ठिकाणांहून पैसा येतो. इतका पैसा त्यांना कोठून आणि कसा मिळत आहे? याची चौकशी होणे गरजेचे आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असून यामध्ये मनी लाँड्रिंग (Money Laundering) होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. तसेच, “हे लोक देशाला ‘चांगले नागरिक’ म्हणून कर (Tax) भरण्याचा उपदेश करतात, मात्र त्यांच्या स्वतःसाठी सर्व काही मोफत कसे काय असू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रियांक खरगे म्हणाले की, ‘वाल्मिकींचे रामायण एक गोष्ट आहे, परंतु आता जे घडत आहे ते वेगळे आहे. राजकारणी आणि धार्मिक नेते त्यांच्या इच्छेनुसार धर्माबद्दल बोलत आहेत. कोणताही धर्म हिंसाचाराला उत्तेजन देत नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, एखाद्याला तीन मुले असली पाहिजेत, पण ते स्वत:च लग्न करत नाही. पण ते इतर लोकांच्या मुलांना वाढवण्याबद्दल बोलत आहेत. ते इतर लोकांच्या मुलांना वाढवण्याबद्दल बोलतात. अशा प्रकारे, भाजप (BJP) सतत आत आणि बाहेर बोलत आहे आणि गरिबांच्या मुलांना रस्त्यावर हिंसाचारासाठी पाठवत आहे.
मोहन भागवत म्हणतात, आरएसएसला नोंदणीची आवश्यकता नाही कारण आपण व्यक्तींचा समूह आहोत. पण आज मी तुम्हाला वचन देतो. आतापासून, ही आरएसएस संघटनेची संविधान आणि कायद्यानुसार नोंदणी होत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. जोपर्यंत कायदा आणि संविधान अस्तित्त्वात आहे, त्यांना ते करावचं लागेल. यासाठी तुम्हाला राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. तुम्हाला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य राहावे लागेल. असंही प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रियांक खर्गे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः संघाच्या नेटवर्कला मिळणाऱ्या परकीय देणग्या आणि त्यातून चालणाऱ्या उपक्रमांवर खर्गे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आता भाजप आणि संघ यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.