'नारी शक्ती वंदन विधेयका'वरून टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. (फोटो - सोशल मीडिया)
Nari Shakti Vandana Bill : नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेत नारी शक्ती वंदन दुरुस्ती कायदा आणि परिसीमन विधेयक २०२६ वर चर्चा सुरू असताना, विरोधी पक्षांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मतदान होण्यापूर्वीच महिला आरक्षण कायद्याची अधिसूचना कशी जारी करण्यात आली, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. याबाबत काँग्रेसने म्हटले की, जनगणनेपूर्वी परिसीमन लागू करणे म्हणजे केवळ संविधानाला कमकुवत करणे आहे. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी महिला आरक्षण कायद्यावर बोलताना सांगितले की, सभापती पद महिलेसाठी राखीव ठेवले पाहिजे. यावेळी त्यांनी श्री राम पत्नी सीता यांचा देखील उल्लेख केला.
तुम्ही सीताजींना विसरला आहात – कल्याण बॅनर्जी
टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “मंत्रिमंडळात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण सुनिश्चित केले पाहिजे. लोकसभा जागांसाठीही टक्केवारीचा कोटा निश्चित केला पाहिजे. ज्या देवीची पूजा प्रभू रामानेही केली होती, आम्ही देवी दुर्गेची पूजा करतो. तुम्ही जय श्री राम म्हणता, तर आम्ही जय सिया राम म्हणतो. अशा प्रकारे तुम्ही सीताजींना विसरला आहात.”असा टोला कल्याण बॅनर्जी यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : सुषमा अंधारेंनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला धरले धारेवर; “महिला अत्याचारावर ब्र शब्द नाही अन्…
लोकसभेत ‘संविधान (१३१ वी) दुरुस्ती विधेयक, २०२६’, ‘सीमांकन विधेयक, २०२६’ आणि महिला आरक्षण कायद्याशी संबंधित ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ यांवरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी असा दावा केला की, भाजपमध्ये महिलांचा आदर केला जात नाही, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने महिलांना लोकसभेत ३९ टक्के आणि राज्यसभेत ४६ टक्के प्रतिनिधित्व दिले आहे, असे मत तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरुन रणकंदन; लोकसभेत राहुल गांधी घेणार खरपूस समाचार
पंतप्रधान मोदींनी खेळ बदलण्यास केली सुरुवात
खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “पुढील निवडणूक आपण हरत आहोत हे लक्षात येताच पंतप्रधान खेळाचे नियम बदलतात. म्हणूनच त्यांनी हे विधेयक आणले आहे. महिलांची नावे घेणे हा एक कट आहे. यामागे खरा हेतू काहीतरी वेगळाच आहे. सत्ताधारी पक्षाला आव्हान देत ते म्हणाले की, “५४३ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवा. आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत पण असे करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही.” अशी टीका खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली.
पंतप्रधान पद महिलांसाठी राखीव पाहिजे
बॅनर्जी यांनी सभागृहाला सांगितले की, “लोकसभेच्या २९ सदस्यांपैकी ११ महिला आणि राज्यसभेच्या १३ सदस्यांपैकी सहा महिला तृणमूल काँग्रेसच्या आहेत. बदलाची सुरुवात घरातूनच होते. सरकारने मूळ विधेयकाची अंमलबजावणी न करताच सुधारणा विधेयक आणले आणि कोणीतरी ही सदोष प्रक्रिया निदर्शनास आणून दिल्यानंतरच गुरुवारी रात्री मूळ कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. मंत्रिमंडळातील पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत. त्यासोबतच, पंतप्रधानपदही महिलांसाठी राखीव ठेवले पाहिजे. तसेही, पुढच्या वेळी पंतप्रधान मोदी सत्तेवर नसतील,” असा मोठा दावा तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे.






