अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने काबूलमधील राजदूत आणि कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, भारतीय अधिकारी आणि इतर भारतीय नागरिकांना देखील या विमानातून भारतात आणण्यात येणार आहे. भारतीय हवाइ दलाचे IAF C-17 हे विशेष विमान मंगळवारी सकाळी काबुलहून 130 पेक्षा अधिक लोकांसह भारताच्या दिशेने निघाले आहे. या विमानातून भारतीय राजदूतही येत असल्याचे बोलले जात आहे.
एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेले उर्वरित भारतीय सुरक्षित आहेत. त्यांना एक किंवा दोन दिवसांत विमानाने भारतात आणण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, ते अफगाणिस्तानमधील प्रत्येक घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आमचं प्रत्येक पाऊल हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असेल.
“आम्हाला माहित आहे की अफगाणिस्तानात काही भारतीय नागरिक आहेत ज्यांना परत यायचे आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही प्रत्येक भारतीयाला आपल्या देशात परतण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही अफगाणिस्तानातील शीख, हिंदू समाजाच्या प्रतिनिधींच्या सतत संपर्कात आहोत, ज्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे त्यांना भारतात आणण्यासाठी पूर्ण सुविधा दिल्या जातील.” असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे ट्वीट
दरम्यान, अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी गृह मंत्रालयाने व्हिसाचे नियम बदलले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, इलेक्ट्रॉनिक व्हिसा ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांना लवकरात लवकर व्हिसा मिळावा म्हणून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.






