Kiran Mane Shared Santosh Movie Banned In India Regarding Post
बॉलिवूड अभिनेत्री शहाना गोस्वामीची मुख्य भूमिका असलेला ‘संतोष’ (Santosh) चित्रपट कमालीचा चर्चेत आला आहे. आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री शहाना गोस्वामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटासाठी युकेने ऑस्करमध्ये प्रवेशिकाही दाखल केली होती, चित्रपटाला ऑस्करमध्ये शॉर्टलिस्टही करण्यात आले होते. हा चित्रपट परदेशात चर्चेत राहतो, पण भारतात चित्रपटाची चर्चा होत नाही. ऑस्करपर्यंत पोहोचलेला ‘संतोष’ चित्रपट परदेशात गाजताना दिसतोय. मात्र या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिले जात नाही. यासंदर्भात अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता किरण माने म्हणतात, “‘संतोष’ नावाच्या एका हिंदी सिनेमानं जगभरात हलचल निर्माण केलीय भावांनो… कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा सुरू आहे… पण भारतात मात्र तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. आहे की नाही गंमत?
एका लहान दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेभोवती फिरणारा हा सिनेमा ब्रिटन, युरोप, अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलाय… पण भारतीय सेन्सॉर बोर्डानं मात्र त्या सिनेमाच्या प्रदर्शनात अडचण निर्माण केलीय. कारण काय? तर या सिनेमात, आपल्या भारतीय व्यवस्थेत दलित आणि मुस्लिम समाजाचं कसं छुपं शोषण केलं जातं याचं भेदक वास्तव उलगडून दाखवलं आहे.
जनमत पाठीशी नसताना झोलझाल करून सत्तेत बसलेले हुकूमशहा सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असतील तर सत्यशोधक, निर्भिड कलाकारांच्या आवाजाला. हिटलरपासून मुसोलिनीपर्यंतची उदाहरणं आहेत इतिहासात. आपल्याकडं हल्ली तर साधे स्टॅंडअप कॉमेडियन्ससुद्धा सत्ताधार्यांच्या बुडाला आग लावताना पहातोय आपण. “कोण नामदेव ढसाळ? आम्हाला माहिती नाही” असं म्हणत नामदेव ढसाळांची कविता सिनेमातून काढून टाकायला लावण्याचा निर्लज्ज भेकडपणा बघतोय… हा तर ऑस्करमध्ये जगभरातल्या सगळ्या देशांमधल्या सिनेमांना तगडी टक्कर देणारा सिनेमा ! डरना तो ज़रूरी है मेरे भाई.
“कुत्रे आहेत, भुंकणारंच…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोणावर भडकली?
शाहाना गोस्वामी या अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रीची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट संध्या सूरी या दिग्दर्शिकेनं दिग्दर्शित केला आहे. ‘संतोष’ नावाच्या महिलेभोवती फिरणारं हे कथानक. पोलीसमध्ये नोकरीला असलेला तिचा नवरा दंगलीत मारला जातो आणि त्याच्या जागेवर तिला भरती करून घेतलं जातं. तिच्याकडं पहिलीच केस येते एका अल्पवयीन दलित मुलीच्या अपहरणाची… ज्या मुलीवर बलात्कार होऊन तिचा खुन झाल्याचं सिद्ध होतं… या तपासाची ही खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी आहे.
आपल्या वर्तमान व्यवस्थेत दलित आणि मुस्लीमांबद्दल आकस धरून कसं शोषण केलं जातं याचं अतिशय प्रभावी चित्रण असलेल्या या सिनेमानं जगात खळबळ माजवलीय. ‘भारतीय समाजव्यवस्थेचा आवाज’ असा चारीबाजूंनी गुणगौरव होतोय… पण आपल्या देशात मात्र हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. भारतीय संविधानाबद्दल आस्था असणार्या या मातीतल्या मूलनिवासी माणसा…
अजून तरी होय जागा । तुका म्हणे पुढे दगा ।।”