भगवान लोके/ सावंतवाडी: वेळागरवासीयांनी एकजूट दाखवत हुकूमशाहीला विरोध केला त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र एकीकडे महिलांचा सन्मान करण्याचा दिखाऊपणा करणारे राज्य सरकार व लोकांना हवा असेल तर प्रकल्प होईल असे म्हणणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्गवासियानी केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला
वेळागरवासीयांच्या या विषयाला 30 वर्षे झाली. गेली 30 वर्षे ते या विषयाची झगडत आहेत. मात्र कमिशन घेऊन आपली राजकीय तुमडी भरण्यासाठी लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला जात असेल तर ते चुकीचेच आहे. ३० वर्ष सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला अशा प्रकारे पोलीस बळाचा पर करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या नावाने गळा काढणारे राज्य सरकार याच महिला, आया बहिणींवर लाठी चार्ज करतात त्यांची डोके फोडण्यापर्यंत यांची मजल जात असेल तर अशांना योग्य वेळी धडा शिकवण्याची गरज आहे.
लोकांच्या मागणीनुसार याबाबत निर्णय होणे अपेक्षित असतानाही पोलीस बळाचा वापर
स्थानिक भूमिपुत्रांचा या प्रकल्पाला विरोध नाही तसा आमचाही विरोध नाही. मात्र तेथील भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी वगळण्याची त्यांची मागणी आहे. त्याबाबत कार्यवाही व्हायला हवी. तेथील लोकांच्या मागणीनुसार याबाबत निर्णय होणे अपेक्षित असतानाही पोलीस बळाचा करण्यात आलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. जोर जबरदस्ती करून प्रकल्प लादला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम राहू असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी मतदारसंघातून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सलग तीनदा निवडून आले आहेत. आजच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून दिपक केसरकर यांना लोकांनी पराभूत करावे हेच आवाहन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.