आपल्याकडील हायवेवरून प्रवास करताना एका गोष्टीकडे लक्ष हमखास जातं—ते म्हणजे ट्रक्सच्या मागे आणि बाजूंना लिहिलेल्या रंगीबेरंगी ‘शायरी’ आणि ‘स्लोगन्स’ यांच्यावर. कधी चेहऱ्यावर हसू आणणारे विनोदी टोमणे, तर कधी थेट काळजाला भिडणारे भावनिक शब्द. हा फक्त ट्रक सजवण्याचा भाग नाही, तर तो रस्त्यावर धावणाऱ्या एका जिवंत, चालत्या फिरत्या साहित्याचा आविष्कारचं आहे असं म्हणायला हवं.
पण कधी विचार केलाय का, की ट्रक ड्रायव्हर्स हे सगळं का लिहितात? या रंजक ओळींमागे त्यांची कोणती मानसिकता आणि भावना लपलेल्या असतात? चला, या फिरत्या साहित्याचा रंजक प्रवास समजून घेऊया.
१.नजरबंदी आणि संरक्षणाची भावना
“बुरी नजर वाले तेरा मुह काला” “बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने!”
ट्रक ड्रायव्हर्ससाठी त्यांचा ट्रक हेच त्यांचं घर आणि रोजगाराचं साधन असतं. लाखो रुपयांचे कर्ज काढून किंवा आयुष्यभराची पुंजी लावून ते हा ट्रक घेतात. रस्त्यावरील अपघात, पोलिसांचा ससेमिरा आणि प्रवासातील अनिश्चितता यातून आपल्या ट्रकचं रक्षण व्हावं, ही त्यांची तीव्र इच्छा असते. म्हणूनच, वाईट नजरेपासून वाचण्यासाठी अंधश्रद्धा किंवा लोकभावनेतून अशा ओळी लिहिल्या जातात. यात केवळ भीती नसते, तर एक प्रकारचा आत्मविश्वासही असतो.
२.घरापासून दूर असण्याची रुखरुख
“घर कब आओगे?” “मिस कॉल तर करशील, पण बॅलन्स कुठून आणशील?”
एक ट्रक ड्रायव्हर सण-उत्सव, सुख-दुःख सगळं सोडून महिनोनमहिने घरापासून, आपल्या माणसांपासून दूर असतो. रात्रीच्या शांततेत हायवेवर ट्रक चालवताना त्यांना आपल्या कुटुंबाची, मुलांची आणि पत्नीची तीव्रतेने आठवण येत असते. हीच विरहाची भावना ट्रकच्या पाठीवर शायरीच्या रूपाने उमटते. शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या मनातील एकटेपणा आणि घराविषयीची ओढ व्यक्त करत असतात.
ट्रकला नवरीसारखं सजवण्याची कला! जाणून घ्या ‘ट्रक आर्ट’च्या कोट्यवधींच्या दुनियेबद्दल
३.‘माझा राजा चालला‘ : छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर
महाराष्ट्रामधल्या ट्रक्सवर “माझा राजा चालला”, “राजे”, किंवा “जय शिवराय” हे शब्द अत्यंत मानाने लिहिलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज हे ड्रायव्हर्ससाठी केवळ राजे नाहीत, तर ते त्यांचे ऊर्जास्थान आहेत. रात्री-अपरात्री, घाटाच्या अवघड रस्त्यांवरून प्रवास करताना महाराजांचे नाव त्यांना एक वेगळीच हिंमत आणि सुरक्षा देते.
४.जीवनाचे तत्त्वज्ञान आणि विनोद
“मालक धनाचा, मी ताकदीचा!” “हस मत पगले, प्यार हो जायेगा.”
ट्रक ड्रायव्हर्सचे जीवन अत्यंत खडतर असते. पण या खडतर प्रवासातही ते आपला विनोदबुद्धी जिवंत ठेवतात. गाण्यांच्या ओळी, टोमणे आणि आयुष्याचं सोपं तत्त्वज्ञान ते अगदी दोन ओळींत मांडतात. “वेळ आल्यावर नक्कीच परत येईन, सध्या रस्ता तुमचा आहे,” अशा ओळींमधून त्यांची जगण्याची जिद्द आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती दिसून येते.
ट्रकमागच्या ‘हॉर्न ओके प्लीज’ पाटीची खरी कहाणी; दुसऱ्या महायुद्धाशी जोडलेलं क्रेझी कनेक्शन!
ड्रायव्हर्सची मानसिकता- शब्दांतून हलकं होणारं मन
ट्रक चालवणे हे केवळ एक काम नाही, तर ते मानसिक थकवा आणणारं कष्टाचं काम आहे. अनेक तास सलग स्टिअरिंगवर हात ठेवून बसताना येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे ड्रायव्हर्स या साहित्याचा आधार घेतात. भावनांचे प्रकटीकरण या ओळींतून केले जाते. जे ते कोणापाशी बोलू शकत नाहीत, ते ट्रकवर लिहून मोकळे होतात. हायवेवर एका ट्रक ड्रायव्हरने दुसऱ्या ट्रकवरील ओळ वाचली की त्यांच्यात एक मूक संवाद साधला जातो, ज्यामुळे त्यांना आपण एकटे नाही आहोत, अशी जाणीव होते.
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हायवेवरून जाल आणि एखाद्या ट्रकच्या मागे एखादी रंजक ओळ वाचाल, तेव्हा फक्त हसून सोडू नका. त्या ओळींमागे शेकडो मैल घरापासून दूर राहिलेल्या एका कष्टकरी ड्रायव्हरच्या मनाची धडधड ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण हे ट्रक्स फक्त माल वाहतूक करत नाहीत, तर ते भारतीय संस्कृती, भावना आणि माणसांच्या सुख-दुःखाचे ‘फिरते साहित्य’ पाठीवर वाहून नेतात.






