
Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात... पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
१) जव्हार
पालघर जिल्ह्यात वसलेले जव्हार हे ठिकाण महाराष्ट्रातील ‘दार्जिलिंग’ म्हणून ओळखले जाते. बहुदा या ठिकाणाबाबत फार कमी पर्यटकांना माहिती आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाय जव्हारला आदिवासी सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. या परिसरातील शांतता पर्यटकांच्या मनाला स्पर्श करुन जाते. येथील ५०० फुटांपेक्षा अधिक उंचीवरुन कोसळणारा दाभोसा धबधबा राज्यातील उंच धबधब्यांपैकी एक आहे. हाच धबधबा जव्हारचे मुख्य आकर्षण आहे. पावसाची चाहुल लागताच शांतता आणि नैसर्गिक सानिध्यात राहण्याच्या उद्देशाने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या भागातील डोंगररांगांमध्ये वारली समुदाय पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहे. गावातील घरांच्या मातीच्या भिंतींवर पांढऱ्या रंगाने रेखाटलेली भौमितिक वारली चित्रकला त्यांच्या समृद्ध कलाकुसरीची साक्ष देतात.
२)चिखलदरा
सातपुडा पर्वतरांगांमध्ये बहरलेले चिखलदरा महाराष्ट्रातील एकमेव कॉफीचे उत्पादन घेणारे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १,११८ मीटर उंचीवर वसलेला हा भाग म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या मुख्य गर्दीपासून दूर असल्यामुळे येथील शांत आणि निवांत वातावरण मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. जून महिन्यात निसर्गाने साद घालताच कॉफीच्या बागांनी नटलेला हा परिसर अधिकच नयनरम्य आणि विलोभनीय दिसतो. चिखलदरा जवळच असलेला मेळघाट व्याघ्रप्रकल्प सकाळच्या डोंगर-दऱ्यांच्या दाट धुक्यांमध्ये हरवून जातो. हे निसर्गाचे एक अनोखे रुप पाहणे म्हणजे स्वर्गसुखच आहे. तसेच घनदाट जंगलामधून झेपावणाऱ्या भीमकुंड धबधब्याचे रुप अनुभवण्यासारखे आहे. प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या या धबधब्याच्या सानिध्यात असताना प्रत्येकाच्या ओठांवरील शब्दच हरवून जातात.
३)माथेरान
वाहनांच्या गजबजाटापासून दूर असलेले भारतातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. जून महिन्यात या ठिकाणाचे सौंदर्य अधिकच बहरते. दाट धुक्याची चादर पसरलेल्या घनदाट जंगलामधून मार्ग काढत टॉय ट्रेन जेव्हा धावते तेव्हा निसर्गाचे मनमोहक रुप अनुभवायला मिळते. लाल मातीचे रस्ते निवांत शांततेत विसावलेले बघताना मन बहरुन जाते. इको पॉईंट, पॅनोरमा पॉईंट आणि मंकी पॉईंट यांसारखी प्रसिद्ध प्रेक्षणीय ठिकाणे धुक्यामध्ये हरवून जातात. पण मजेशीर गोष्ट म्हणजे, निसर्गाचा हाच लपंडाव मनाला सर्वाधिक भुरळ पाडतो. डोळ्यांना दरीचे विस्तीर्ण रूप गवसण्यापूर्वीच तिचा आवाज आपल्या कानावर पडतो. पावसाळ्याच्या संथ लयीत हरवलेल्या या ठिकाणाकडे मन भरुन बघत असताना निसर्गाप्रती एक कृतज्ञतेची भावना दाटून येते.
४)कोयनानगर
निवांत पर्यटन (Slow Tourism) या आधुनिक संकल्पनेचा पर्यटकांना परिचय होण्यापूर्वीच कोयना नगरमध्ये संथ आणि निवांत क्षण अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात अनुभवता येत आहेत. कोयना धरणाच्या आधारे निर्माण झालेल्या विस्तीर्ण शिवसागर तलावाच्या शेजारी वसलेले सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रात येते. हेच लक्षात घेऊन येथे जाणीवपूर्वक आणि गरजेनुसारच विकास मर्यादित ठेवण्यात आला आहे. जूनमध्ये पावसाचा जोर वाढत असताना येथील वनराईला नवा बहर येतो. दिवसागणिक जंगल अधिकच घनदाट रूप धारण करते. वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसागर तलावामधून बोटीने प्रवास करण्याचा अनुभव म्हणजे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. या प्रवासादरम्यान किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची उत्सुकता आणखीनच वाढते.
५)माळशेजघाट
महाराष्ट्रातील पावसाळा अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेचा प्रवास जितका सुंदर वाटतो, तितकाच माळशेज घाटही मनाला भुरळ पाडतो. या दिवसांमध्ये माळशेज घाटात जाणे म्हणजे निसर्गाच्या पानावर उमटलेली एक कविता अनुभवण्यासारखे आहे. डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे घाटात पांढऱ्याशुभ्र चादरीसारखे भासतात. तसेच या ठिकाणाजवळच असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयामध्ये कधीकधी फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शनही घडते. चहूबाजूंनी दाट धुक्यामध्ये हरवलेल्या माळशेज घाटाचे रूप न्याहाळताना मन प्रसन्न होते. जवळच असलेला हरिश्चंद्रगड अनुभवी गिर्यारोहकांना साद घालतो. तसेच फक्त पावसात उभे राहून जगण्याचा निखळ आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांना हा घाट आपलेसे करतो.
६)आंबोली
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या दक्षिण टोकाला वसलेले आंबोली हे खूप सुंदर पण अजूनही पर्यटकांच्या नजरेआड असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळातही येथील धबधबे आणि प्रेक्षणीय ठिकाणे एका नवीन प्रवासाचा अनुभव देतात. आंबोली घाटात सह्याद्रीतील सर्वात जास्त पाऊस पडतो. येथील जंगलात अतिशय दुर्मिळ असा ‘आंबोली बुश फ्रॉग’ हा बेडूक आढळतो. निसर्गप्रेमी आणि वन्यजीव संशोधकांसाठी हे ठिकाण खऱ्या अर्थाने मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण परिसरात पसरलेली दाट धुक्यांची चादर, छोटे-मोठे धबधबे आणि बेडकांचे एकाच सुरात ओरडणे पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. आंबोली म्हणजे महाराष्ट्रातील पावसाळ्याचे सर्वात सुंदर आणि देखणे रुप आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रभर भटकंती करत असताना अनेक गोष्टी साद घालतात. धो-धो पावसात भिजण्याची, प्रवासातील विलंबाचा आनंद लुटण्याची, नव्या वाटांवरुन प्रवास करण्याची, कधीतरी एखाद्या ढाब्यावर थांबून चहा पिण्याची, कुठेही पोहोचण्याची घाई नसताना वेळेचे भान विसरुन विसावण्याची तुमची तयारी असायला हवी. शेवटी हाच प्रवासाचा सर्वात सुंदर अनुभव आहे, हेच खरे.