
Anxiety cases surge India Lancet report, mental health crisis among Indian youth,
‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकाच्या अहवालानुसार, भारतात गेल्या तीन दशकांमध्ये एंग्झायटीच्या प्रकरणांमध्ये १२३.५ टक्क्यांची धक्कादायक वाढ नोंदवली गेली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, देशात प्रति लाख लोकसंख्येमागे मानसिक आजारांचा सर्वाधिक भार हा १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरुणांवर आहे. शिक्षण, करिअर आणि नात्यांमधील दबाव त्यांच्या मानसिक स्थितीवर सातत्याने परिणाम करत आहे. महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.
स्ट्रेस (तणाव) तणाव ही एखाद्या बाह्य कारणामुळे (उदा. ऑफिसचे काम, परीक्षा किंवा आर्थिक समस्या) निर्माण झालेली मेंदूची तात्कालिक प्रतिक्रिया असते. ते मूळ कारण संपताच स्ट्रेस देखील नष्ट होती.
एंग्झायटी (घबराट/चिंता): कोणतेही बाह्य कारण नसतानाही मनात सातत्याने भीती किंवा घबराट राहणे म्हणजे एंग्झायटी होय. एखाद्या ‘बॅकग्राउंड म्यूझिक सारखी मनात सतत घोंगावणारी ही अस्वस्थता दैनदिन कामे करणेही कठीण करून टाकते.
जगभरात मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, ही बाब आता जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान बनली आहे. University of Queensland यांच्या सहकार्याने आणि Institute for Health Metrics and Evaluation (IHME) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जगभरात अंदाजे १.२ अब्ज लोक विविध मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत.
अभ्यासानुसार, ही संख्या १९९० च्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. २०२३ पर्यंत उपलब्ध आरोग्य संसाधनांची पर्वा न करता मानसिक विकार सर्व देशांमध्ये मोठा आरोग्य भार निर्माण करत असल्याचे निष्कर्षांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मानसिक विकार आता जागतिक स्तरावर अपंगत्वाचे प्रमुख कारण बनले असून, त्यांनी हृदयरोग, कर्करोग आणि स्नायू व हाडांशी संबंधित (मस्क्युलोस्केलेटल) आजारांनाही मागे टाकल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
चिंतेच्या विकारांबरोबरच भारतीयांमध्ये इतर मानसिक विकारांचे प्रमाणही वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
१९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे स्किझोफ्रेनियाची ३१६ प्रकरणे नोंदली गेली होती. ही संख्या २०२३ मध्ये वाढून ३२१ वर पोहोचली आहे.
तर गंभीर नैराश्य विकाराच्या (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. १९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे २,१४७ प्रकरणे होती, ती २०२३ मध्ये २,७९९.६ पर्यंत वाढली.
दीर्घकालीन नैराश्य मानल्या जाणाऱ्या डिस्थायमियाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली असून, १९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे ९०२ प्रकरणे होती, ती २०२३ मध्ये ९४८ पर्यंत पोहोचली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-१९ महामारीनंतर चिंता आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, पर्यावरणीय परिस्थिती, वाढलेली स्पर्धा आणि मानसिक आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता यामुळे प्रकरणांची नोंद अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि Queensland Centre for Mental Health Research येथील सहयोगी प्राध्यापक Damian Santomauro यांनी सांगितले की, कोविड महामारीशी संबंधित दीर्घकालीन ताण, गरिबी, असुरक्षितता, गैरवर्तन, हिंसाचार आणि सामाजिक संबंध कमी होणे यांसारख्या कारणांमुळे मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
अभ्यासातील निष्कर्षांनुसार, १५ ते १९ वयोगटातील युवकांमध्ये मानसिक आरोग्य समस्यांचा भार सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक, उपचारांची सुलभ उपलब्धता आणि उच्च-जोखीम गटांसाठी विशेष आधारव्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे.