फोटो सौजन्य: Gemini
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसू लागले असून त्याची झळ ग्रामीण भागालाही बसू लागली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी, स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा शोध घेत नागरिक पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. सोनई परिसरात सध्या सरपणाची मागणी वाढली असून आरा गिरण्यांमध्ये लाकडाच्या सरपणाची विक्री दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी तर स्वयंपाकासाठी लाकडाच्या सरपणाचा पर्याय स्वीकारला असून त्यामुळे गावातील आरा गिरण्यांमध्ये सरपणासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. सरपणाच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरातही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी मर्यादित प्रमाणात होणारी सरपणाची विक्री आता दररोज होत असल्याने आरा गिरण्यांमध्ये सरपण कापण्याचे कामही वाढले आहे. याचबरोबर हॉटेल, खानावळी तसेच बेकरी व्यवसायिकांनाही गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे.
Ahilyanagar News: महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले 1710 कोटीचे अंदाजपत्रक
अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून पुन्हा पारंपरिक भट्टया पेटवून लाकडावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर स्वयंपाकासाठी मोठ्या चुली उभारून त्यावर अन्न तयार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पूर्वी वापरात असलेल्या या पद्धती पुन्हा एकदा व्यवहारात येताना दिसत आहेत.
गॅस टंचाईमुळे शेगड्यांची मागणीही अचानक वाढली आहे. गावातील इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये शेगडी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अनेक दुकानदारांकडे शेगड्यांचा साठा कमी पडत असल्याचे सांगितले जात आहे. स्वयंपाकाची सोय खंडित होऊ नये यासाठी नागरिकांनी इलेट्रिक शेगडी हा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना या पर्यायी साधनांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिली, तर ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुलीवरील स्वयंपाकाचे दिवस परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वयंपाकाची सोय खंडित होऊ नये यासाठी नागरिकांनी इलेट्रिक शेगडी हा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना या पर्यायी साधनांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी तर स्वयंपाकासाठी मोठ्या चुली उभारून त्यावर अन्न तयार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा शोध घेत नागरिक पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. सोनई परिसरात सध्या सरपणाची मागणी वाढली आहे.






