५३ हजार ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प (File Photo : Solar Energy)
अकोला : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या अकोला परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अकोला परिमंडळातील ५३ हजार ८५४ वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता २०० मेगावॅटचा टप्पा पार झाला आहे. दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे, तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील २० हजार ३४२ ग्राहकांनी ७८.०१ मेगावॅट, बुलडाणा जिल्ह्यातील २४ हजार २७१ ग्राहकांनी ८८.६१ मेगावॅट, तर वाशिम जिल्ह्यातील ९ हजार २४१ ग्राहकांनी ३३.५८ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प घरांच्या छतावर उभारले आहेत. या योजनेत केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे ग्राहकांच्या वीज वापराच्या तुलनेत अधिक वीज निर्माण झाल्यास त्यांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
अतिरिक्त वीज महावितरणला देण्याचीही सुविधा आहे. योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना आवश्यक असलेले सोलर नेट मीटर महावितरणकडून विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचा खर्च वाचत असून, मोबाईलवरच वीजनिर्मिती, वीज वापर आणि अतिरिक्त वीज याबाबतची माहिती दररोज मिळते. या माहितीच्या आधारे ग्राहकांना वीज वापराचे योग्य नियोजन करून वीजबिल कमी करता येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
महावितरण राज्यातील नोडल एजन्सी
महावितरण ही राज्यातील या योजनेची नोडल एजन्सी असून, ग्राहक व सौर प्रकल्प पुरवठादारांसाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवून वीज ग्राहकांना आपले वीज योजनेचा लाभघेण्यासाठी ग्राहकांना संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. विशेष अनुदान असलेल्या या योजनेत परिमंडळातील जास्तित जास्त वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी म्हटले आहे.






