
NSUI holds Mashaal Morcha protest in Amravati against paper leak, CBSE paper leak, NEET Paper Leak, Yashomati Thakur, Congress,
अमरावती, प्रतिनिधी: नीट आणि सीबीएसई परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन अभ्यास करतात, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत आहे. पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदल्या केल्या जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
‘नीट’ आणि ‘सीबीएसई’परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या गंभीर गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.५) रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती येथे भारतीय राष्ट्रीय छात्र संघातर्फे (एनएसयुआय) भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मशाल मोर्चामध्ये एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, खासदार बळवंत वानखडे, माजी महिला व बालविकास मंत्री एँड. यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआयचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
‘कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा
मोर्चाची सुरुवात शहरातील ऐतिहासिक इरविन चौक येथून करण्यात आली. आंदोलकांनी प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाली प्रज्वलित केल्या. हातात मशाली आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून जयस्तंभ चौकात पोहोचला. तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गभर आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे अमरावती शहर दणाणून गेले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, दोषींना तात्काळ कडक शिक्षा मिळावी आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील विश्वासार्हता व पारदर्शकता अबाधित राहावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकला जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला.