‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा
सकाळी चाळीसगाव येथे पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव विधानसभा मतदार संघांची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मतदार याद्या २०२२ मध्ये तयार झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी राज्यात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार आहे. ३० जूनपासून घरोघरी जाऊन मतदार यादी पुनर्निरीक्षण केले जाईल. त्यामुळे ‘बीएलओ’च्या कामावर ‘बीएलए’ आणि समन्वयकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पुढील तीन महिने ‘एसआयआर’ मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून सर्वांनी काम करावे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. पक्षात जो काम करतो त्यालाच शिंदे साहेब पद देतात. यामुळे एक सर्वसामान्य घरातील महिला ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याचे काम शिंदे साहेबांनी केलं. शेतकरी चळवळीतील नेते बच्चू कडू यांना हेरून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे काम शिंदे साहेबांनी केले. आताही विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. यापुढे शिफारशींवर नेमणुका होणार नाहीत तर कामाच्या आधारेच संघटनेत पदं दिली जातील, असे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, चाळीसगावमध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालून इथली दादागिरी मोडून काढली पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बळ देऊन पाचोरा आणि एरंडोलप्रमाणे इथंही पक्ष मजबूत करा. आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी एकजुटीने काम करा, चाळीसगावमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात, घरात आणि प्रत्येक तालुक्यात शिवसेना वाढली पाहिजे. उन्मेष पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले.
दुपारी अमळनेर येथे चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या विधान सभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, बीएलए १ आणि बीएलए २ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समन्वयक नियुक्त करावा. तो समन्वय ‘बीएलए’च्या बैठका घेईल आणि दैनंदिन कामाचा आढावा घेईल. आपल्या मतदारांची नावे वगळली तर पुढे त्याचा पाठपुरावा करावा लागेल. जळगावातील मतदार संघांवरील शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुका युतीचा तालुका होता. जळगाव जिल्ह्यात हिंदुत्वावादी मतांचा पगडा आहे आणि तो कायम राहिला आहे, असे मंत्री पाटील आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या घोषणेमुळेच आज राज्यात दोन लाख रुपयांची कर्ज माफी केली. ‘एनडीआरएफ’चे निकष शिथिल करण्याचे काम शिंदे सरकारने केले. स्वयंरोजगार, रोजगार, पोलीस पाटील, कोतवाल, आशा, अंगणवाडी सेविका, लाडकी बहिण यांच्याबाबत घेतलेले निर्णय आणि योजनांमुळे राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले, असे मंत्री पाटील म्हणाले. तत्पूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी रात्री धुळे जिल्ह्यातील साक्री, सिंधखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण, धुळे शहर या विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोन दिवसाच्या शिवसंवाद दौऱ्यात खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे जिल्हे पिंजून काढले. या तीन जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदार संघाचा खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. पहिल्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे अक्कलकुवा, शहादा, नंदुबार येथे नवापूर व नंदुरबार, धुळ्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण, धुळे शहर या मतदार संघांचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी चाळीसगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव, अमळनेर येथे चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर मतदार संघांचा आणि मुक्ताईनगर येथे रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर विधानसभांची आढावा बैठक घेतली. नुकताच खासदार डॉ. शिंदे यांनी मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा दौरा केला होता.
‘कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा






