आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज; देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलपूजेसाठी दाखल
Pandharpur News: आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. टाळ मृदंगआणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हालेली असून, रविवार, ६ जुलै रोजी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक आज पंढरपूरात दाखल होणार आहेत.मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे पहाटे २.२० वाजता विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा करतील. या पवित्र क्षणासाठी पंढरपूर मंदिर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच अधिकारीवर्गही या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख मार्ग, वेशी, रस्ते, आणि मंदिर परिसर फुलांनी, विद्युत रोषणाईने सजवण्यात आला असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. विठुरायाच्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या गजरात आणि ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल’च्या घोषणांनी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठल-रुखमाईची शासकीय पूजा करतात. ही परंपरा सन 1973 पासून सुरु झाली असून, दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक मानाचे वारकरी दाम्पत्य देखील या पूजेला उपस्थित असते. हे वारकरी दाम्पत्य कोण असेल, याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती घेते. विशेष बाब म्हणजे या निवडीसाठी कोणतीही राजकीय शिफारस, वशिला किंवा ओळख चालत नाही.
भारताचे Olympics 2036 च्या यजमानपदासाठी प्रयत्न! IOC ने दिल्या ‘या’ गोष्टी सुधारण्याच्या सूचना..
शासकीय पूजेसाठी पहाटेच्या वेळी मंदिराचे दरवाजे बंद करून पूजा पार पडते. याच वेळी, दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. म्हणजे, जे वारकरी दाम्पत्य त्या क्षणी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर दर्शनासाठी सर्वात अगोदर उभं असतं, त्यांनाच शासकीय महापूजेसाठी निमंत्रित केलं जातं.
ही संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक आणि श्रद्धायुक्त आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. योगायोगाने पहिल्या क्रमांकावर असणं हेच या पूजेसाठी पात्रतेचे एकमेव निकष मानले जातात. निवड झालेल्या दाम्पत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील करण्यात येतो. ही परंपरा हजारो भाविकांसाठी श्रद्धेचा आणि अभिमानाचा क्षण असतो. विठुरायाच्या कृपेने कोणीही या मानासाठी पात्र ठरू शकतो, हे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेतून अधोरेखित होते.






