विद्यानंद बापट मारहाणीवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा
Vidyanand Bapat Attack: पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) कोथरूड परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बापट हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मुलाखत देत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. यावरून आता सर्वच स्तरावरून चर्चा होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावरून आपली भूमिका मंडळी आहे.
घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत संतोष चव्हाण याला अटक केली. तो कोथरूडमधील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असून स्थानिक प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर अशाप्रकारे हल्ला होणे गंभीर असल्याचे सपकाळ यांनी म्हटले.
ते म्हणाले, “पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण होणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे..! मोदी-फडणवीसांच्या राज्यात सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित नाही, हे बापट यांच्यावरील हल्ल्याने पुन्हा सिद्ध झाले आहे. आता गृहमंत्री फडणवीस ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतात की हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार..? फडणवीसांनी स्पष्ट करावे..!”
पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण होणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे..! मोदी-फडणवीसांच्या राज्यात सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित नाही, हे बापट यांच्यावरील हल्ल्याने… pic.twitter.com/r8i94YhzkA — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) September 3, 2026
हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुंडांना संरक्षण मिळणार की कायद्याचा धाक निर्माण केला जाणार, याबाबत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण याने आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप नसल्याचे सांगितले. गणेशोत्सवाबाबत टीका करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे भूमिका घेणार असल्याचे त्याने म्हटल्याचे समोर आले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
हल्ल्यानंतर बापट यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. आपण प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अचानक हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गणेशोत्सवासह कोणताही सार्वजनिक सण साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. उत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन झाले पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचे बापट यांनी सांगितले.






