फोटो सौजन्य-X
हिंगणघाट : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल 941 कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे.
मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे 26 कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दिवाळीच्या काळात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसतानादेखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.
एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्चदेखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, टायर व सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीच्या खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे.
तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटींचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करून नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.
विविध सरकारी योजनांमुळेही फायदा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. कारण, राज्य शासनाने एसटी प्रवासभाड्यात सवलत देणाऱ्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि ‘महिला सन्मान योजना’ सुरू केल्यापासून एसटी पुणे विभागाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत दर वर्षी उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे. यातून उत्पन्नात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
२०२२-२३ या वर्षात धावल्या ३२९ बसेस
पुणे विभागातून २०२२-२३ या वर्षात ३२९ ‘लाल परी’ रस्त्यावर धावल्या. यातून २ कोटी १२ लाख ९६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या काळात केवळ ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू होती. शिवाय, करोना प्रादुर्भावामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणदेखील होते. तसेच, कर्मचाऱ्यांनी दोन-अडीच महिने संप पुकारल्यानेही उत्पन्नावर परिणाम झाला.