संग्रहित फोटो
पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील समान पाणी पुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुणे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कामाबाबतचा सविस्तर तपशील पाटील यांच्यासमोर मांडला. समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून, त्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये अस्तित्वातील जीएसआर अथवा प्रस्तावित ईएसआर/ जीएसआर (पाण्याच्या टाक्यांमधून) झोनसाठी पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. अस्तित्वातील वितरण नलिका व आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांना दिली.
१६ टाक्यांचे काम पूर्ण
कोथरूड मतदारसंघातील १७ झोनमधील अस्तित्वातील नवीन पाण्याच्या टाक्यांपैकी १६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून; आयडियल कॉलनी टाकीच्या जागेबाबत लॉ कॉलेज, पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर सर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत तसेच आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना दिल्या.
मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोथरुड मधील १७ झोन मध्ये २८३९७ इतके एएमआर मीटर बसविणे प्रस्तावित असून, २३२०९ एएमआर मीटर बसवण्यात आले असून, उर्वरित सुमारे ५००० एएमआर मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. सदर कामामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून २० टक्केपर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कामे सुरु आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांना दिली. त्यावर मंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता, खडकवासलामधून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून; त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला.