
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा (Photo Credit- X)
धरण नियंत्रण कशाकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या नोंदीनुसार धरणातील उपयुक्त साठा १७६०.७९९ दलघमी (८१.११%) इतका आहे, तर एकूण साठा २४९८.९०५ दलघमी नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा १६२०.५४८ दलघमी (७४.६५%) होता. म्हणजेच यंदा सुमारे १४० दलघमी अधिक पाणी उपलब्ध असून टक्केवारीत ६.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापराच्या दृष्टीने आश्वासक मानली जात आहे.
नाथसागरच्या डावा व उजवा कालवा प्रणालीमुळे पैठणसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे २ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व भाजीपाला पिकांसाठी हा साठा जीवनरेषा ठरत आहे. सध्याच्या समाधानकारक पातळीमुळे शेवटच्या आवर्तनासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारलेली १६०० मि.मी. व्यासाची समांतर जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वाढीव मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तसेच जालना शहरासह वाळूज, शेंद्रा डीएमआयसी, चिकलठाणा, पैठण व चितेगाव येथील औद्योगिक पट्ट्यांसाठीही नाथसागरचा साठा स्थिर आधार देत आहे.
नियोजनबद्ध वापर आणि उपलब्धता यामुळे शहरी पाणीपुरवठ्याबाबत सध्या दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच, नाथसागर धरणातील भक्कम साठ्यामुळे मराठवाड्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून योग्य नियोजन कायम राहिल्यास येणारा उन्हाळा तुलनेने सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सध्या धरणातील दररोजचे बाष्पीभवन १.०३२ मिमी इतके नोंदवले गेले आहे. उन्हाळ्यात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जलतज्ज्ञांच्या मते, चाढीव साठा आणि विस्तीर्ण पृष्ठभागामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाफेच्या स्वरूपात नष्ट होऊ शकते. वाढीव उपसा आणि बाष्पीभवन या दुहेरी परिणामामुळे एप्रिल-मे महिन्यात साठ्यावर दबाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.