
पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याची विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार प्राप्त होताच अन्न सुरक्षा विभागाने पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील कँटीनवर धाड टाकली. कँटीन तपासणीत मुदतबाह्य अन्नसाठा, अस्वच्छता, खाद्यरंगाचा वापर अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने कँटीनचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दिनांक ३ जुलै रोजी सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि कीर्तिका झाडे यांनी ही कारवाई केली. विद्यार्थ्यांनी पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याचे व्हिडिओसह अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागाने कँटीनची अचानक तपासणी केली.
कँटीन परवाना निलंबित
तपासणीदरम्यान कँटीनमध्ये मसाले व इडली रवा यांचा मुदतबाह्य साठा आढळून आला आहे. हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. याशिवाय अन्नपदार्थ तयार करताना खाद्यरंगाचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. कँटीन परिसरात सर्वत्र अस्वच्छता आढळून आल्याने अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर त्रुटी लक्षात घेऊन संबंधित कँटीनचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
तपासणीत काय आढळले?