संग्रहित फोटो
मुंबई : मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची वास्तवदर्शी व्यथा मांडणारे “कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे” हे अत्यंत भावस्पर्शी गीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आले. विजय मुंडाले आणि अर्जुन युवनाते हे हे या गीताचे गीतकार आणि निर्माते आहेत तर मनीष राजगिरे हे गायक आहेत. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीसह इतर आवश्यक मदत करण्याची मागणी यावेळी सपकाळ यांनी केली. कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे या गीताच्या माध्यमातून गीतकार देखील सरकारला आवाहन करीत आहेत.






