साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच; जयंत पाटलांचे सूचक विधान
Islampur News: राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या बैठका पार पडल्या, मात्र समितीत एकमत न झाल्याने हा विषय सहकार क्षेत्राचे मार्गदर्शक खा. शरदचंद्र पवार यांच्या एक सदस्यीय लवादाकडे सोपवण्यात आला आहे. पवारसाहेब या संदर्भात साखर कामगारांच्या हिताचा योग्य निर्णय लवकरच घेतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामनगर येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे नूतन जनरल सेक्रेटरी राऊ पाटील (कोल्हापूर) आणि कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण (नवेखेड) यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. हा सत्कार राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आणि वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, उपाध्यक्ष विजय राव पाटील, प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, खजिनदार प्रदीप बनगे, सचिव संजय बोरमाळे, दिलीप भोरे, तानाजीराव खराडे, मोहनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
आपल्या भाषणात आ. जयंतराव पाटील म्हणाले, “साखर कामगार चळवळीत किशोर पवार, बी. आर. पाटील, आर. बी. शिंदे, शंकरराव भोसले यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत नवे पदाधिकारी कामगारांना न्याय मिळवून देतील. कामगारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा आणि आपल्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा.” यावेळी त्यांनी अनेक जुने प्रसंगही उलगडून सांगितले.
नूतन जनरल सेक्रेटरी राऊ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सहकार चळवळ टिकवण्यासाठी कामगारांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. साखर कारखाना हीच आपली रोजीरोटी आहे, हे भान कायम ठेवावे.” कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, “स्व. शंकरराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २१ वर्षांपासून काम करत आहे. आमदार जयंतराव पाटील, संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि राऊ पाटील यांच्या आशीर्वादाने राज्यभर काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी तानाजीराव खराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील, संचालक विठ्ठलतात्या पाटील, कार्तिक पाटील, राजकुमार कांबळे, डॉ. योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, कामगार प्रतिनिधी विकास पवार, खजिनदार सचिन कोकाटे, योगेश पवार आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी व कामगार उपस्थित होते. मनोहर सन्मुख यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रसिद्धी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी केले.
भर पावसातही सत्कार समारंभ!
कारखान्याच्या गेटवर हा सत्कार समारंभ सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र आ.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील, तसेच कामगार व अधिकारी जागेवरून हलले नाहीत. कार्यक्रम पुढे चालू राहिला. थोड्या वेळाने पाऊस थांबला.