
शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी मागणी
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पुस्तकाची विक्री व वितरण तात्काळ थांबवावे, संबंधित लेखक व प्रकाशकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व १९६ अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, तसेच पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तींवर सायबर कायद्यांनुसार निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली.
कोणी केले आंदोलन?
हिंदू जनजागृती समितीच्या भक्ती डाफळे यांनी या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा अपमान झाल्याचा आरोप केला. इतिहासाचे चुकीचे चित्रण करून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू महासभेचे अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत कठोर कारवाईची मागणी केली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरूराज रसाळ यांनी शिवचरित्राची विकृती करणाऱ्या लिखाणाला विरोध कायम राहील, असे सांगितले. तसेच, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनावणे यांनी या पुस्तकामुळे तरुण पिढीमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे यांनी राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
काय आहे वाद?
कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या जुन्या पुस्तकातील मजकूर आणि शीर्षकावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या पुस्तकात इतिहासाची मोडतोड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप केला आहे, तर पुरोगामी संघटनांनी हे पुस्तक छत्रपतींचा ‘लोकराजा’ म्हणून इतिहास मांडत असल्याचे सांगून यावर बंदी घालण्यास विरोध केला आहे. दरम्यान हा वाद वाढीला लागला आहे.