
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
गांधी मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख शरद कणसे, हरिभाऊ जगदाळे, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले, युवासेना अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
साताऱ्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, “ही यशवंत विचारांची भूमी आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा दृष्टा नेता या मातीत जन्माला आला. परंपरा आणि विकासाचा संगम असलेल्या या जिल्ह्यात झालेले गलिच्छ राजकारण जनता विसरणार नाही.” जिल्हा परिषदेत घडलेल्या घटनांवर सध्या भाष्य टाळत असलो, तरी योग्य वेळी शिवसेनेचा ‘हिसका’ दाखवू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी मालक-नोकर नाही. कार्यकर्त्यांच्या कुवतीनुसार पदे दिली जातात. गाव तेथे शिवसेना ही मोहीम राबवा, मतदार यादीवर लक्ष ठेवा. तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे.” सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशाची कबुली देत, “बहुमत असूनही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडता आले नाहीत, ही खंत आहे,” असे सांगितले. साताऱ्याला पर्यटन हब बनवण्यासाठी आराखडा तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका करत, “खरी शिवसेना कोणती असा प्रश्न विचारणारे आता राजकारणातून हळूहळू संपत आहेत,” असा टोला लगावला. साताऱ्यात आयटी पार्क आणि फलटण येथे ग्रामीण एमआयडीसी प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
दरम्यान, विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. निलेश मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेत शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दर्शवला. मेळाव्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा