
वाशीमध्ये रंगणार धाराशिव ग्रंथोत्सव; ग्रंथदिंडी, परिसंवाद, कविसंमेलनासह विविध उपक्रमांची मेजवानी (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व वाशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव ग्रंथोत्सव–२०२५ चे आयोजन १४ व १५ फेब्रुवारी रोजी वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर येथे करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन-विक्री अशा विविध उपक्रमांची मेजवानी ग्रंथप्रेमींना मिळणार आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होईल. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता वाशी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जुनी बाजारपेठ येथून ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. नगराध्यक्ष विजया गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, नायब तहसीलदार पूजा पाटील, तसेच ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिंडीचे पूजन होईल. दिंडीचे संयोजन हभप ज्ञानेश्वर सूर्यवंशी पाटील करणार आहेत.
दुपारी १२ ते २ या वेळेत “वाचन संस्कृती आणि आजची स्थिती” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी असतील. अनुराग ढवळे, अनिता मुदकना, सुधीर माने, लक्ष्मण बिराजदार व डॉ. महेश मोटे सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन संगीता भांडवले करतील. दुपारी ३ ते ५ या वेळेत संगीता गुंजाळ कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होईल. कमलाकर भोसले, स्वरां धोरात, गायत्री कवडे व शिवानंद माळी यांचा सहभाग राहील. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सदाशिव जगताप यांच्या अध्यक्षतेत विविध गुणदर्शन कार्यक्रम व सांस्कृतिक सादरीकरण होईल. शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्री सर्वांसाठी खुले राहणार आहे.
रविवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत “अहिल्याबाई होळकर – जीवन व कार्य” या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक व इतिहास संशोधक युवराज (बप्पा) नळे असतील. डॉ. क्रांती मोरे व माधुरी घोडके सहभागी होतील. सूत्रसंचालन साधना खिडेकर करतील.
दुपारी १.३० ते ४ या वेळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी अश्विनी धाट असतील. सुवंता तांबे, शशिकला गुंजाळ, प्रा. मनीषा नाईकवाडे, संगीता भांडवले, संध्याराणी कोल्हे, आशा राऊत, आनंदी पाटील, ॲड. जयश्री तेरकर, मीना महामुनी, सरिता उपासे, शरद गायकवाड, राजेंद्र सगर, सुधीर कांबळे, राजेंद्र टाचतोडे, गंभीरे पेंटर, आश्रुबा कोठावळे, डॉ. मधुकर हुजरे, बाळासाहेब मगर, शंकर खामकर व काशिनाथ बिराजदार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन अविनाश भारती करतील.
दुपारी ४ ते ६ या वेळेत ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. कदम (अध्यक्ष, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक दुनघव, अंकुर सोनटक्के व प्रा. एस. एल. पवार उपस्थित राहतील. सूत्रसंचालन सुहास सरवदे करतील. जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.