‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे काही कार्यकर्ते उमरगा तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी कार्यालयातील शिपाई साफसफाईच्या कामात व्यस्त होते. आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदार बसत असलेली खुर्ची केबिनमधून बाहेर काढून तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंड्याच्या कट्ट्याजवळ आणण्यात आली. या खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात अण्णासाहेब गोविंदराव पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार (सर्व रा. नाईचाकूर) आणि वैजिनाथ आबा काळे (रा. माडज, ता. उमरगा) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गोविंद येरमे यांनी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आंदोलकांना वाहनात बसण्यास सांगितले असता त्यांनी त्यास विरोध केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेले. या दरम्यान आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ‘मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे’, ‘देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलक पोलीस ठाण्यात पोहोचले.
तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश करताना आंदोलकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिपायाला धक्काबुक्की करून बळजबरीने प्रवेश केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. तहसीलदार गोविंद येरमे यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांशी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली.
घटनेनंतर तहसीलदार गोविंद येरमे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खात्री नसलेले मेसेज किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत आणि वस्तुस्थिती समजून घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.






