(Photo - Social Media)
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. सरकारसोबत मागण्यांवर चर्चा सुरू असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. एकीकडे सरकारकडून बैठका घेऊन मागण्या मान्य केल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे सरकारने काहीही मान्य केलं नसल्याचं जरांगे पाटील स्पष्टपणे सांगत आहेत.
मंत्री उदय सामंत यांनी सरकारने जरांगे यांच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचं म्हटलं. मात्र हा दावा जरांगे पाटलांनी फेटाळून लावला आहे. ‘15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलू नये, असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. यावर जरांगे पाटील यांनी थेट उत्तर दिलं. “चुकीच्याला चुकीचं म्हणू नको काय? तुम्ही आम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवलं आहे का? तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे. शिंदेंनी चूक केली ती कबूल करा.”
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलल्याचं वाईट वाटलं, मात्र शिरसाटांचं ऐकून मराठा समाजाची प्रमाणपत्रं रद्द का केली, असा सवालही त्यांनी उदय सामंत यांना केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला. “राधाकृष्ण विखेंचं सोडून काहीही विचारा. मराठ्यांना याने अर्धवट फासावर सोडून दिलं. हा फक्त आंदोलन कसं मोडलं पाहिजे यांचं बघतो.” फडणवीस आणि शिंदे यांच्या सांगण्यावरून सरकारमधील मंत्री आपल्यावर हल्लाबोल करत आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याच्या दाव्यावर जरांगे पाटील चांगलेच संतापले. “15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणं म्हणत नाहीत. खाली ते मान्य केलं जातं नाही, तुम्ही गरीबांचं वाटोळं केलं. तुम्ही मराठा समाजाला पश्चाताप करण्याच्या उंबरठ्यावर आणलं.”
सरकार शिष्टमंडळासमोर एक आणि नंतर वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “तुम्ही काहीही मान्य केलं नाही, 15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही.”
एकेरी भाषेत बोलल्यास जशास तसं उत्तर देऊ, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं होतं. त्यावर जरांगे पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली. “मी तयार आहे, कधीही सज्ज आहे, माझ्या नादेला लागायचं नाही. माझ्याकडे पुरावा आहेत. मीडियात पुरावा देईन, मी शिंदेंवर बोलणार आहे.”
मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये, असंही जरांगे यांनी सुनावलं. दरम्यान, नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीवरूनही त्यांनी भाष्य केलं असून, या सगळ्या घडामोडींमुळे आरक्षणाचा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.






