
धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका
शीतलकुमार शिंदे । नवराष्ट्र : धाराशिव जिल्ह्यात आपत्कालीन आरोग्यसेवेसाठी कार्यरत असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. अपघात, हृदयविकाराचा झटका, मेंदूविकार किंवा इतर जीवघेण्या परिस्थितीत “गोल्डन अवर”मध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक असताना रुग्णवाहिका तासन्तास उशिरा पोहोचत असल्याने रुग्णांच्या जीविताशी प्रत्यक्ष खेळ होत असल्याची संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
धाराशिव ते बेंबळी मार्गे उजनी (ता. औसा, जि. लातूर) या मार्गावरील आंबेवाडी चौरस्ता येथे शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी दुचाकी व महालिंगी (ता. धाराशिव) येथील कार यांच्यात अपघात झाला. गंभीर जखमी रुग्णासाठी १०८ वर संपर्क साधण्यात आला. मात्र बेंबळी ग्रामीण रुग्णालय अवघ्या ३ किमी अंतरावर असतानाही तेथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे १ तास उशीर लागल्याची गंभीर बाब समोर आले आहे. या दरम्यान रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने नातेवाईकांनी खाजगी वाहनाने धाराशिव येथे रुग्णास हलविले.
देवळाली येथे सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या अपघातातही १०८ रुग्णवाहिका वेळेत न आल्याने या अपघातातील अत्यवस्थ रुग्णाला खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागले. सलग दोन घटनांमुळे या आपत्कालीन सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१०८ ही रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्त व अत्यवस्थ रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र कॉल रिसिव्हिंगमध्ये विलंब रुग्णवाहिकेचे घटनास्थळी उशिरा पोहोचणे चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती किंवा हलगर्जीपणा, नियंत्रण कक्षातील समन्वयाचा अभाव या कारणांमुळे सेवेचा उद्देशच फोल ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे हा जीवनाच्या हक्काचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर न येता विलंब होणे हे या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे. परिणामी रुग्णवाहिका सेवेकडून सातत्याने होणाऱ्या विलंबस कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
१०८ सेवा ही रुग्णवाहिका सेवा शासनाच्या कराराअंतर्गत चालवली जाते. करारातील प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाइम) पाळला गेला नाही, तर संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई, दंड आकारणी किंवा करार रद्द करण्याची तरतूद असते. या प्रमाणे कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका सेवांच्या मानामनिस त्रस्त नागरिकांची ओरड वाढली असून जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिकांची संख्या व त्यांची प्रत्यक्ष कार्यरत स्थिती प्रशासनाने जाहीर करावी. प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाइम) सार्वजनिक करावा. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली कार्यरत आहे का, याची माहिती द्यावी. दोषी चालक/अधिकाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाई करावी. स्वतंत्र चौकशी समिती नेमून अहवाल जाहीर करावा. अशीही मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.
आपत्कालीन आरोग्यसेवा ही केवळ योजना नसून ती नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित व्यवस्था आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवेतील त्रुटी तातडीने दूर करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा विश्वास पूर्णपणे ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.