
खेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत; धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात
राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामाची चाहूल लागली असून भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धूळवाफेवर साळीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. काही भागात झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली असून आता बळीराजा समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची ओळख भाताचे आगार म्हणून आहे.
पोषक हवामान, सुपीक जमीन आणि मुबलक पर्जन्यमान यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. भात लागवडीपूर्वी रोपे तयार करण्यासाठी साळ पेरणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. या पेरणीतून तयार होणारी रोपे पुढे मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर धूळवाफेवर पेरणी सुरू केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात सरासरी १८०० ते २००० मिलिमीटर पाऊस पडत असल्याने खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक मानले जाते. मात्र, यंदा हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मॉन्सूनपूर्व पाऊसही अत्यल्प झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पर्यावरणपूरक पद्धतीने रोपवाटिका तयार
सध्या उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. भाताची रोपे तयार करण्यासाठी अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने जमीन भाजून त्यावर साळ पेरणी करतात, तर काही शेतकरी सेंद्रिय खते व शेणखतांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने रोपवाटिका तयार करत आहेत.
ठळक मुद्दे नेमके काय?