
Fire at a Chemical Company in Tasawade MIDC Karad Fire News
Tasawade MIDC Fire : उंब्रज : अनिल कदम : तासवडे येथील औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी भीषण आग आणि स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. (Satara News) केमिकल कंपनीत झालेल्या या दुर्घटनेने काही काळ भीतीचे सावट पसरले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम्ब्रोजिल बेस’ उत्पादनाशी संबंधित एसकेएस फाईन केम (प्लॉट नं. B-1/47) या कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीचे मालक सर्जेराव किसन साळुंखे (रा. उंब्रज, मूळ पाटण) असून व्यवस्थापक सचिन व्यंकटराव मानकर आहेत. (Fire News)
आदल्या दिवशी केमिकल बॉयलर चार्जिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कंपनी सुरू करताना बॉयलर पेटवण्यात आल्यानंतर अचानक आग लागली. काही क्षणातच उच्च तापमानामुळे केमिकलने भरलेल्या बॅरल्सना स्फोट होऊ लागले. स्फोटांची तीव्रता इतकी होती की तब्बल ५ किलोमीटर अंतरावरूनही आवाज ऐकू येत होता. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व उंब्रजचे पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार कल्पना ढवळे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, डीवायएसपी राजश्री पाटील यांनीही तत्काळ उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
हे देखील वाचा : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात
दरम्यान, कराड नगरपालिका, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार माल जळून खाक झाला आहे. औद्योगिक वसाहतीत काही काळ भीतीचे वातावरण होते; मात्र वेळेवर कामगार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला आहे.
पूर्वसूचना धुडकावल्या का? प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष?
विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी तासवडे MIDCतील उद्योगांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारे देण्यात आले होते. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याच्या आणि प्रत्येक MIDCमध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
हे देखील वाचा : नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त? राजकीय फायद्यासाठी केली नाशिकवारी
पुणे जिल्ह्यातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली, हा आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
बैठकीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 110 केव्ही सबस्टेशन उभारण्यासह खराब वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच कामगारांच्या आरोग्यासाठी ESIC रुग्णालय सुरू करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर तासवडे येथील आजची दुर्घटना ही केवळ अपघात नसून प्रशासनाच्या सूचनांकडे झालेल्या दुर्लक्षाचे दाहक उदाहरण ठरत असल्याची चर्चा औद्योगिक वर्तुळात रंगू लागली आहे.