
'ज्ञानबा-तुकाराम'चा जयघोष आता सातासमुद्रापार; लंडनहून 'ग्लोबल वारी' पंढरपूरकडे रवाना!
लंडनमधील रॉयल विंडसर रेसकोर्स परिसरातून या वारीला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करून वारीचे विधिवत प्रस्थान करण्यात आले. या सोहळ्यासाठी युनायटेड किंगडमसह युरोपातील विविध देशांतील वारकरी, विठ्ठलभक्त, अनिवासी भारतीय आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गतवर्षी डॉ. खेडकर यांनी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन २२ देशांमधून तब्बल १८ हजार किलोमीटरचा कारने प्रवास केला होता. ७० दिवस चाललेल्या या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच या ‘ग्लोबल वारी’ची संकल्पना साकार झाली.
यंदा पहिल्यांदाच लंडनहून ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ सुरू करण्यात आली असून ती सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ धार्मिक यात्रा नसून वारकरी परंपरा, संत विचार, विठ्ठल भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचवणे हा आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसह विविध देशांतील भारतीय समुदायाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
वारीदरम्यान सहभागी वारकरी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन आणि नामस्मरण करत विठ्ठल भक्तीचा जागतिक संदेश देत आहेत. “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने इंग्लंडमधील वातावरण भक्तिमय झाले असून, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा ही केवळ धार्मिक नसून समता, बंधुता, साधेपणा आणि मानवतेचा संदेश देणारी जीवनशैली मानली जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांनी प्रेरित ही वारी शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू राहिली आहे. आता त्याच वारीचे जागतिक स्वरूप साकार होत असल्याने हा उपक्रम वारकरी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान,पंढरपुर येथे होणाऱ्या आषाढी वारीसोबत या ग्लोबल वारीचा भावनिक आणि सांस्कृतिक संबंध जोडला गेला असून, विठ्ठल भक्तीचा संदेश आता जगभर पोहोचत असल्याची भावना वारकरी समुदायातून व्यक्त होत आहे.
“… यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश