
ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला ४४५ शिक्षक उपलब्ध झाले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशन करून रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. हे शिक्षक पुढील १० ते १५ दिवसात संबंधित शाळांमध्ये रुजू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे १८५ वर येणार आहे. उर्वरित पदे दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पवन खंडारे यांनी दिली.
जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक विभागातील बंगाली माध्यमाची ५, हिंदी माध्यमाची ९५, मराठी माध्यमाची ४७८ आणि माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाची ५०, अशी एकूण ६२८ रिक्त पदे होती. यापैकी प्राथमिक विभागातील बंगाली माध्यमाची ३, हिंदी माध्यमाची ६७, मराठी माध्यमाची ३३० आणि माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाची ४५, अशी एकूण ४४५ पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात आली.
येत्या दोन दिवसांत प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. प्रथम शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर समुपदेशनाद्वारे शाळांची नियुक्ती दिली जाईल. उपलब्ध शिक्षकांना तातडीने रुजू करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. उर्वरित १८५ रिक्त पदे दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची शक्यता आहे.
येत्या दोन दिवसात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यानंतर समुपदेशनाद्वारे संबंधित शिक्षकांना शाळांची नियुक्ती देण्यात येईल. पुढील १० ते १५ दिवसात सर्व शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजू होतील. असे लायकराम भेंडारकर, अध्यक्ष, जि.प. गोंदिया यांनी सांगितले.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. उपलब्ध झालेले ४४५ शिक्षक तातडीने शाळांमध्ये रुजू झाल्यास त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. असे मत पवन खंडारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया जिप यांनी व्यक्त केले.