महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त १६ गावातील एकुन ४१४ कुटुंबातील १९३२ नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या पैकी अनेक कुटुंबांनी गाव सोडून इतरत्र परंतु सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे. कुंभरोशी येथील हायस्कुलमध्ये स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट घेवून त्यांना दिलासा दिला आहे.
गेली दोन आठवडे महाबळेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील अनेक आजही नदी नाले ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही गावे दरड प्रवण व पूर भागात असल्याने तेथील कुटुंबाचे प्रशासनाने युध्द पातळीवर स्थलांतर केले आहे. दुधोशी, घावरी, येरणे बु , येरणे खु , एरंडल, चतुरबेट, भेकवलीवाडी, मालुसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली, नावली, झांझवड, मोरणी या १६ गावातील ४१४ कुटुंबातील सुमारे १९३२ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या गावातील स्थलांतरीतांसाठी कुंभरोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल, सौंदरी येथील प्राथमिक शाळा, शिंदोळा येथील प्राथमिक शाळा व गणेश मंदीर तर धावली येथील जन्नीमाता मंदीर व प्राथमिक शाळेसह दोन खाजगी बंगले देखील घेण्यात आले आहेत.
स्थलांतरीतांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार
स्थलांतरीत लोकांची सोय करण्यात आलेल्या शिबीरास महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट देवून शिबीरातील लोकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या या लोकांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात येईल अशी माहीती तहसीलदार पाटील यांनी दिली. स्थलांतर करण्यात आलेल्या काही गावातील लोकांनी स्वत: शेजारच्या गावात नातेवाईकांकडे व इतरत्र सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे त्यांच्या अडचणीकडे देखिल प्रशासन लक्ष देत आहे.