फोटो - सोशल मीडिया
सातारा : राज्यभरामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. पाच दिवसांचे गणपती आणि गौराई यांना निरोप दिल्यानंतर साताऱ्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लोकं घराबाहेर पडू लागले आहेत. रिमझिम पावसात जिवंत देखावे आणि गणरायाचे भव्य मोहक स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. रिमझिम पाऊस असला तरी भक्तांच्या उत्साहात कुठेही कमीपणा जाणवत नाही. साताऱ्यामध्ये देखील लोकांचा मोठा समुदाय गणपती पाहण्यासाठी बाहेर पडत आहे. तसेच पुण्यामध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाचा उत्तरार्ध सुरू झाला असून येत्या १६ तारखेला सातारा शहरातील 44 तर उर्वरित 206 मंडळांचे विसर्जन दि. १७ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे गणेशोत्सवातील देखावे म्हणजे समाज प्रबोधनासाठीचे व्यासपीठ असल्याने अनेक विषयांवर समाजमन तयार करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झाला आहे. स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय ऐक्य वाढवण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तोच वारसा देखाव्याच्या माध्यमातून जपला जात आहे. यावर्षी अल्पवयीन अत्याचार, महिला सुरक्षा, ऐतिहासिक स्मृतीस्थळांची पडझड अशा अनेक ज्वलंत विषयांमुळे समाजमन ढवळून निघाले आहे. गणेश मंडळांच्या देखाव्यांमधून असेच ज्वलंत विषय, घटनांबाबत सामाजिक जबाबदारी व जाणीव निर्माण करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गौरी विसर्जनाबरोबर हे देखावे खुले झाले असले तरी देखाव्यांसाठीचा मंच उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ऐतिहासिक घटनांसाठी ऐतिहासिक महल व वास्तुंची प्रतिकृती उभारण्यात मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. स्थानिक कलाकारांच्या तालमीसह दिग्दर्शन, वेशभूषा, नेपथ्य, संवाद आदी सर्व जबाबदारी मंडळाचे कार्यकर्ते पार पाडत आहेत.
जीवंत देखाव्यांवर भर
सातारा शहर व परिसरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे देखाव्यांचे विषय व नियोजनही नीटनेटके केले जाते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत सातारा शहरातील काही गणेशमंडळांनी यावर्षी जीवंत देखाव्यांवर भर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन, महिला सन्मान, योग्य व त्वरित न्यायनिवाडा, तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी लूट आदिविषयांवर जीवंत देखावे गणेश भक्तांना पहायला मिळणार आहेत. पोलीस यंत्रणा झाली सतर्क सातारा शहरांमध्ये दि. १६ व दि. १७ रोजी एकूण २५० गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांचे दोन टप्प्यांमध्ये विसर्जन होणार आहे. त्यामुळे सातारा शहरात ५०० हून अधिक पोलीस सातारा शहरांमध्ये तर जिल्ह्यामध्ये दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.
मंडळांच्या मंडप परिसरात सीसीटिव्हीची नजर
सातारा शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परिसरात सीसीटीव्ही तपासणी महिलांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था यासारख्या उपायांची काटेकोर पाहणी स्वतः पोलीस अधीक्षक समीर शेख करणार आहेत. विसर्जन तळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सातारा पालिकेने डागडुजी केली असून वीज वाहिन्यांचा अंतर्गत अडथळा कोठे आहे का हे सुद्धा तपासले जात आहे. रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू राहणार असल्याने साध्या वेशातील सातारा शहर पोलिसांचे डीबीचे ४० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार आहे. सर्व बंदोबस्ताची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाहणी केली असून त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे.
पारंपरिक वाद्यांना बारा वाजेपर्यंत मुभा
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्वतः या बंदोबस्ताचे नियंत्रण करणार आहेत. दोन बेस आणि दोन टॉप अशी साउंड सिस्टीमला परवानगी दिली असून पारंपरिक वाद्यांना बारा वाजेपर्यंत मुभा असणार आहे, ही सर्व वाद्य यंत्रे प्रमाणित डेसिबलमध्येच वाजवण्यास परवानगी आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या साउंड सिस्टीवर कारवाई टाळली जावी, याकरता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. तसेच मिरवणुकांमध्ये कोठेही अंतर पडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. सातारातील वर्दळीचे मार्ग दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर समीर शेख यांनी दिली आहे.