राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो - ai gemini)
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच तेलंगणाच्या उत्तरेकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या पोषक हवामानामुळे राज्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन दिवस नैऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय २ जुलैपासून वायव्य भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. शहराचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारी आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भिरातील पाऊस ढगफुटी नव्हे!
भिरा येथे २४ तासांत ४०७ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर हा प्रकार ढगफुटीचा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हा पाऊस ढगफुटी नसून सक्रिय मॉन्सून आणि घाट परिसराच्या भौगोलिक रचनेचा परिणाम असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे पुण्याचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. एका तासात १०० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला तांत्रिकदृष्ट्या ढगफुटी म्हणतात. भिरातील पाऊस मात्र २४ तासांत टप्प्याटप्प्याने झाल्याने तो ढगफुटीच्या निकषात बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘अरबी समुद्रातून येणारे दमट मॉन्सूनी वारे सह्याद्रीच्या डोंगररांगांना धडकत असल्याने हवेची ऊर्ध्वगामी हालचाल होते आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे कोयना, ताम्हिणी किंवा रायगडच्या घाट परिसरात सक्रिय मॉन्सूनच्या काळात २४ तासांत २५० ते ३०० मिमी पाऊस पडणे ही सामान्य बाब आहे.’
— कृष्णानंद होसाळीकर, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा: कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
गेल्या २४ तासांतील प्रमुख पावसाची नोंद (मिमीमध्ये)
भिरा – ४०७
लोणावळा – १६०
डोंगरवाडी – १५८
ताम्हिणी – १२५
पोफळी – १२५
वळवण – १२५
धारावी – ८१
खोपोली – ७५






