मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सातत्याने घडणाऱ्या चाकूबाजीच्या घटनांमुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मेट्रो आणि विमानतळाच्या धर्तीवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, मुंबईतील विस्तीर्ण उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये अशी व्यवस्था राबवणे व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याचे रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) स्पष्ट केले आहे. चालत्या लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची चाकूने वार करून हत्या झाल्यानंतर लोकलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.(फोटो सौजन्य – istock)
रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे की, केवळ जनजागृती करून सुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही. लोकलच्या प्रत्येक डब्यात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्लॅटफॉर्म तसेच निर्जन भागांमध्ये निगराणी वाढवणे आणि आरपीएफ, जीआरपी व स्थानिक पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे. अलीकडील घटनांमध्ये प्रवाशांसोबतच लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
जीआरपीनुसार मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर १०० हून अधिक स्थानके, हजारो प्रवाशांची रोजची गर्दी आणि असंख्य प्रवेश-निर्गमन मार्ग आहेत. त्यामुळे मेट्रोप्रमाणे प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे किंवा पूर्णपणे नियंत्रित प्रवेश व्यवस्था लागू करणे कठीण आहे. मात्र, सुरक्षा मजबूत करण्यासाठी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे, अचानक बैंग तपासणी, जनजागृती मोहीम आणि अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यानंतर सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध उपायांवर भर दिला जात आहे.
केवळ जनजागृती मोहीम पुरेशी नाही. २००६ नंतर सुरू झालेली बेंग तपासणी पुन्हा नियमित करणे आवश्यक आहे. पुरेसे मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्कॅनिंग व्यवस्था प्रभावीपणे राबवता येऊ शकते. प्रत्येक स्थानक, प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ आणि निर्जन भागात सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे, असे मत गणेश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. लोकलमध्ये चाकूबाजीच्या घटना वाढत आहेत. यात हत्या झाल्या असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकलच्या डब्यांमध्ये सीसीटीव्हीची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे मत प्रवीण वाजपेयी, अध्यक्ष, सीआरएमएस यांनी मांडले आहे.






